दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, बचतीचा थेट फायदा विद्यार्थ्यांना मिळणार असून, आगामी काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात कपात करण्याचा सकारात्मक विचार बोर्डाकडून सुरू आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा निर्णय घेतला. यात प्रश्न रचनेत बदल नसून, पानांची सेटिंग बदल करून फॉन्ट लहान, मोठे करणार आहे. प्रश्नपत्रिका छपाईवर दरवर्षी ३० कोटी खर्च होतात. सध्या बाजारात रायटिंग व प्रिंटिंग पेपरचा भाव ७५,००० ते ८५,००० रुपये प्रति टन आहे. बदलामुळे २००० टन कागदाची बचत होऊन १५ ते १८ कोटी रुपये वाचणार आहेत. तर प्रिंटिंगसाठीच्या २ कोटी रुपयांचीही बचत होईल. दुसरीकडे, राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल, वेळेबाबत नियोजन सोपे जाईल. कठोर कायदा अन‌् पारदर्शकता बोर्डाने परीक्षा पद्धतीत सुधारणेसोबत गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ मध्ये दुरुस्ती केली जात आहे. आता उत्तरपत्रिकांशी छेडछाड किंवा पुनर्मूल्यांकनातील गैरप्रकार हे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे ठरवले जातील असे देखील स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!