बातमी ऐका (Marathi Voice Reader)
प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी केले. विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप मेजर गर्गे-कुलकर्णी यांच्या ‘सावरकरांच्या स्वप्नातील शस्त्रसिद्ध भारत’ या विषयावरील व्याख्यानाने झाला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. पहलगाम येथे पाकिस्तानच्या धर्मांध दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला भारताने मुत्सद्देगिरी आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाद्वारे घेतला, असे सांगून मेजर गर्गे म्हणाल्या, युद्ध कधी, कसे लढायचे आणि योग्य वेळी कोठे थांबायचे, याचा नवा आदर्श भारताने जगासमोर ठेवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ मर्यादित लष्करी कारवाई नसून, दहशतवादा विरोधातील निर्णायक संघर्षाची नांदी आहे. सूडाच्या भावनेपेक्षा नियोजनबद्ध रणनीतीने भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. या सोहळ्यास महापौर ज्योती गाडे, उद्योजक अश्विन गांधी, रा.स्व.संघाचे माजी जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, जनजाती कल्याण आश्रमचे प्रांत पदाधिकारी महेंद्र जाखेटे, विशारद पेटकर, दिनकर घोडके, अशोकराव गायकवाड, भावना लांडगे आदी उपस्थित होते. विचार भारतीचे मनोज झंवर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला, तर नीता गांधी, सुनील नागोरी, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदींनी पाहुण्यांचा सत्कार केला. दीड तास श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान माऊली सभागृहात सुमारे दीड तास मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी राष्ट्ररक्षण, सावरकरांचे विचार आणि आधुनिक युद्धनीती यांचा अत्यंत प्रभावी परामर्श घेतला. त्यांच्या अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि ओजस्वी मांडणीने उपस्थित शेकडो श्रोते भारावून गेले होते. व्याख्यानाच्या समारोपानंतर संपूर्ण सभागृह ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून त्यांना मानवंदना दिली.