शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोट नगरपरिषदेकडून काढण्यात आलेले श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर प्रतिसादाअभावी पडून राहिले आहे. संबंधित कामासाठी एकाही कंत्राटदाराने किंवा संस्थेने निविदा दाखल न केल्याने निर्बीजीकरणाची मोहीम रखडली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांकडून श्वानांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा, यासाठी नव्याने निविदा काढण्याबाबत तसेच पर्यायी उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गांभीर्याने हाताळून निर्बीजीकरणाची मोहीम लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. निर्बिजीकरणाकरिता अकोट नगरपरिषदेकडून चार वेळा निविदा करूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नसल्याने भटक्या कुत्र्यांना आवर घालणे कठीण झाले आहे. शहरातील विविध भागात दररोज कुत्रा चावल्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निर्बीजीकरणाचा ठेका रखडल्याने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नांना विलंब होणार असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर ^खानापूर परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. – प्रवीण तेलगोटे, नागरिक. बंदोबस्तासाठी पर्यायी व्यवस्था करणार ^निर्बिजीकरणाकरिता चार वेळा निविदा काढूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नाही. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तात्पुरती पर्यायी व्यवस्था करणार आहोत. – शशिकांत बाबर, मुख्याधिकारी, नगरपरिषद. उपाययोजना करणार ^श्वानांच्या नियंत्रणासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढलेल्या निविदेला आजवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा देण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणार . – माया धुळे, नगराध्यक्षा
