निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य, पाण्याचा संथ प्रवाह आणि मनाला असीम शांती देणारे वातावरण… अकोला जिल्ह्यातील कापशी गावातील ऐतिहासिक इंग्रजकालीन तलावाच्या काठावर वसलेले ‘स्वयंभू गणपती’ मंदिर हजारो भाविकांच्या भक्ती व विश्वासाचा जिवंत वारसा बनले आहे. दैनंदिन धावपळीतून दोन क्षण सुखाचे व अध्यात्मिक ऊर्जेचे अनुभवण्यासाठी हे पवित्रस्थान नागरिकांसाठी एक उत्तम केंद्र ठरत आहे. कापशी गावातील तलावाच्या नयनरम्य आणि शांत काठावर विराजमान असलेले स्वयंभू गणपती मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे पवित्र स्थान भाविकांना मानसिक शांती, समाधान आणि अध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात गणरायाविषयी अपार श्रद्धा निर्माण होते. सन २०११ पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. तलाव परिसर शांत आणि निर्मनुष्य होता. मात्र, १ ऑक्टोबर २०११ रोजी घडलेल्या एका अद्भुत घटनेने या परिसराला नवी ओळख मिळाली. गावातील एक गुराखी जनावरांना चारण्यासाठी या भागात आला असता त्याला झाडाझुडपांमध्ये गणपतीची स्वयंभू मूर्ती आढळून आली. ही बातमी गावभर पसरताच भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. कालांतराने या ठिकाणाची कीर्ती पंचक्रोशीत आणि नंतर जिल्हाभर पसरली. तेव्हापासून आजपर्यंत असंख्य भाविक या गणरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आपल्या सुख-दुःखाच्या भावना, आशा-अपेक्षा आणि मनोकामना भक्त गणरायासमोर व्यक्त करतात. कापशीच्या तलावाकाठी विराजमान असलेला हा स्वयंभू गणराय केवळ एक मंदिर नसून श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा जिवंत वारसा आहे. काळाच्या ओघात या मंदिराने भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. भक्ती, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे अनुभवास येतो. गणेश चतुर्थीला विविध कार्यक्रम दरवर्षी गणेश चतुर्थीनिमित्त येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाआरती, भजन-कीर्तन, पूजा-अर्चा, महाप्रसादाचे वाटप केले जाते. हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन गणरायाचा आशीर्वाद घेतात. त्या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाते.