देशात ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरात वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आयोजित ‘जनआक्रोश आंदोलना’दरम्यान ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरा मारला, महिलांनी गॅस सिलिंडरला हळदीकुंकू वाहून त्याचे पुजन केले.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इंधन दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल, महागाई हटाव, मोदी हटाव आणि शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले.
महायुतीला एकनाथ शिंदे नकोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले, नवी मुंबई हे शहर ठाणे जिल्ह्यातच येते आणि एकनाथ शिंदे हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही जर त्यांना त्यांच्याच कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यक्रमात बोलावले जात नसेल, तर राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे स्पष्ट होते. वास्तविक पाहता, महायुतीला आता एकनाथ शिंदे नकोच आहेत.
गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही! अंबादास दानवे पुढे म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटात सध्या केवळ ‘आडवा आणि जिरवा’ असे राजकारण सुरू असून महायुतीमधील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवर खोचक टिप्पणी करताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे नाराज होऊन फार फार तर काय करतील? दोन-तीन दिवस गावी जाऊन येतील, याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, अशी बोचरी टीकाही दानवे यांनी यावेळी केली.