जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुसद शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल व ई-बाईक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गीताई केंद्र येथे सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांचा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच पाणी साठवणुकीच्या बाबतीत पुसद तालुका मागे असल्याची खंत व्यक्त करत जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. यानंतर प्रभात फेरीला प्रारंभ झाला. गीताई केंद्र येथून निघालेली फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कापड लाईन, महात्मा गांधी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे स्व. वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली. या ठिकाणी डॉ. संजय अग्रवाल यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. वाढते तापमान, बिघडलेले ऋतुचक्र आणि पाण्याचे संकट या पार्श्वभूमीवर, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुसद शहरात पर्यावरणाचा जागर करण्यात आला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी एक भव्य सायकल आणि ई-बाईक प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि जलसंधारणाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या उपक्रमाला पुसदकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ११ हजारांची देणगी यावेळी निसर्ग संवादच्या वतीने गजानन वायकुळे आणि राजीव कांडलकर यांनी मिशन ग्रीन संस्थेच्या पर्यावरण संवर्धन कार्यासाठी ११ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. कार्यक्रमाच्या शेवटी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनतर्फे सहभागींसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, रुग्णमित्र फाउंडेशन, ज्ञानदीप अकॅडमी, नाम फाउंडेशन, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, डॉक्टर असोसिएशन, वंदे मातरम सायकल ग्रुप, पतंजली योग समिती, निसर्ग संवाद, पुस सेवा फाउंडेशन आणि गीताई केंद्र यांसह अनेक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.