अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा मार्ग परिसरातील नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अकोट-अकोला मार्गावरील पळसोद फाटा, गांधीग्राम, करोडी फाटा, देवरी फाटा, बळेगाव आणि तांदूळवाडी या सर्वच ठिकाणी काँक्रीट मार्ग दबला असून त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पळसोद फाटा येथे तर गेल्या महिनाभरात दोन भीषण अपघात होऊन दोन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण कायमचे दिव्यांग झाले आहेत. सार्वजनिक पैशातून होणाऱ्या या विकासकामांच्या गुणवत्तेचे तातडीने ऑडिट करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुरुस्ती करा, अन्यथा रस्त्यावर उतरू देवरी फाटा आणि पळसोद फाटा येथे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे दोन बळी गेले आहेत. संबंधित विभागाने तातडीने या मार्गाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अन्यथा रस्त्यांची लढाई रस्त्यावर उतरून लढली जाईल,अशा शब्दात डॉ. योगेश गायकवाड यांनी इशारा दिला आहे. रास्ता रोको आंदोलन करणार अकोट-अकोला मार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाही लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग ढिम्म आहेत. ही गंभीर समस्या त्वरित न सोडवल्यास देवरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,अशी प्रतिक्रीया व्यावसायिक मयुर वाघोडे यांनी दिली.
