पुसद-हरदडा दरम्यान महाराष्ट राज्य पायाभूत सुविधा मंडळा अंतर्गत सुरू असलेल्या पाऊने चारशे कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी सिमेंट रस्ते प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा मंडळ बांधकाम विभागाच्या नागपुर विभागीय स्तरावरील दिरंगाईमुळे कासवगतीने सुरू असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सध्या शहरात सुरू केलेल्या अर्धवट अवस्थेतेतील अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता धूसर दिसत असल्याने शहर नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागण्यची चिन्हे आहेत. दि. १५ जून रोजी शाळा, महाविद्यालय तसेच खरीप हंगाम कृषी बाजार पेठेत नागरिकांची गर्दी होणार असल्यामुळे व्यापारी व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. अपूर्ण सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. पुसद – उमरखेड मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. शहारात एक किमीचे रस्ते काम येते. कडेच्या नाल्या व तुटलेले पूल नव्याने केल्या गेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नैसगिक पडणारे पाणी शहराबाहेर कसे जाणार हा मोठा प्रश्न भेडसावणार आहे. अर्धवट अवस्थेत असलेली रस्ता बांधकाम पावसाळ्यापुर्वी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांची अक्षरशः सत्वपरीक्षा होत आहे. विशेषतः यूपीपी कॉलनी ते गो. सी. गावंडे महाविद्यालय परिसरातील रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या प्रकल्पामध्ये सिमेंट रस्ता, नाल्यांचे बांधकाम, पथरस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच आधुनिक विद्युत पथदिव्यांची सुविधा उभारण्यात येणार आहे, मात्र प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांकडून “संकल्प पूर्ती हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून सुमारे १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करुन घेतल्याचे सांगितले जाते. मात्र निधी उपलब्ध असतानाही प्रशासकीय दिरंगाई आणि कामाच्या अंमलबजावणीतील विलंबामुळे प्रकल्प रेंगाळत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासन, संबंधित यंत्रणेने ठोस पावले उचलावीत कंत्राटदार जीएनआय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम थांबवले जाते की, संबधित विभाग देखभालीमध्ये कमी पडतो, याविषयी द्विधा अवस्था आहे. कामाच्या गतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्ते, नाल्या आणि इतर मूलभूत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणती ठोस पावले उचलावीत. समन्वय साधून कामे युद्धपातळीवर पूर्ण करा पावसाळ्यापूर्वी कामांना वेग न मिळाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याबरोबरच विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी समन्वय साधून कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढीव निधीची मंडळ स्तरावर प्रक्रिया सुरू ^रस्त्याच्या कमांच्या नियमित देखभाल दुरूस्ती सुरुच आहे. शहरामध्ये १४ मीटर रुंदीचा रस्ता असून, सध्या डिझेल तुटवडा निर्माण झाल्याने याचाच एक परिणाम म्हणून कामास गती मिळने अवघड झाले आहे. कामास १०० कोटी अतिरिक्त निधी वाढ मिळाली असली तरी त्या बाबतीत मंजुरी मिळवुन घेणे ही प्रक्रिया मंडळ स्तरावर सुरू आहे. – प्रशांत पागृत, अधीक्षक अभियंता मरापा विकास मंडळ नागपूर.
