वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती सेमिनारचे आयोजन स्थानिक व्हेनेशियन हॉल येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांच्या समन्वयाने करण्यात आले. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या सेमिनाराचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी वाहन चालक तसेच नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे सर्वच मान्यवरांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहन चालक, स्कूल बस चालक, खाजगी बस चालक व रिक्षा चालक अशा जवळजवळ ३५० वाहन चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते किशन सिंह, सेव लाईफ फाउंडेशन दिल्ली यांनी सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, मद्यपान करून वाहन न चालवणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहतूक नियमांचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वक्त्यांनी सांगितले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने जबाबदारीची भावना ठेवून वाहन चालवणे आवश्यक आहे. तसेच वेग मर्यादेचे पालन, मोबाइलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहतूक संकेतांचे पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला. मार्गदर्शन करते वेळी त्यांनी वाहन चालकांना समजेल अशा पद्धतीने वेळोवेळी चित्रिकरण दाखवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सुद्धा वाहन चालकांना त्यांच्या जीवनातील रस्त्यावर अनुभवलेले अपघात प्रसंग सांगून वाहनचालकांना रस्ता सुरक्षा बद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील डॉ. उमेश मडावी यांनी वाहनचालकांना गोल्डन होअर्स बद्दल सांगून सीपीआर कसा द्यावा प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच अपघात काळी वापरावयाचे आपत्कालीन नंबर सांगितले. पालकांनीही मुलांना दुचाकी देताना त्यांना नियम समजावून सांगावेत. यामुळे अपघात घडण्यापासून बचाव करता येईल. सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते किशन सिंह, सेव लाईफ फाउंडेशन दिल्ली यांनी सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम, वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, मद्यपान करून वाहन न चालवणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहतूक नियमांचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वक्त्यांनी सांगितले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने जबाबदारीची भावना ठेवून वाहन चालवणे आवश्यक आहे. ज्ञानोबा देवकते, पोलिस निरिक्षक जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ यांनी रस्ता सुरक्षा यावर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात वाहन चालक तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाहन चालकांची शपथ ”मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन, वेगावर नियंत्रण ठेवेन आणि स्वतःसोबतच इतरांच्याही प्रवासाची सुरक्षा सुनिश्चित करेन,’ असा निर्धार व्यक्त करीत उपस्थित सर्व चालकांनी या प्रसंगी सुरक्षित वाहन चालविण्याची व रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सामूहिक शपथ घेतली.