पेरणीसाठी दमदार पावसाची गरज; शेतकरी बांधव प्रतिक्षेत:अधूनमधून पावसाची हजेरी, मात्र पेरणीसाठी ओल नाही‎

तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सर्वत्र समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक राहिल्याने जमिनी मोठ्या प्रमाणात तापल्या आहेत. मागील काही दिवसांत पाऊस पडूनही जमिनीच्या आतपर्यंत आवश्यक ओल पोहोचलेली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीचा निर्णय घेतलेला नाही. एक-दोन वेळा झालेल्या पावसामुळे वरवर ओल निर्माण झाली असली, तरी पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नाही. यंदा अवकाळी पावसाने तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली होती. काही ठिकाणी नाल्यांनाही पाणी आले होते. मात्र त्याचवेळी कडक उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने पडलेले पावसाचे पाणी लवकर आटून गेले. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतरही हीच परिस्थिती कायम असून, पडणाऱ्या पावसाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून पडत असला तरी तो समाधानकारक नसल्याने बहुतांश शेतकरी अजूनही पेरणीपासून दूर आहेत. काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली असली तरी त्यांच्याही मनात चिंता वाढली आहे. कारण उगवलेल्या बियांना पुढील काही दिवसांत पुरेसा पाऊस न मिळाल्यास तीव्र उष्णतेमुळे रोपे करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या भरोशावर काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली होती. त्या बिया आता अंकुरित होऊ लागल्या आहेत. मात्र पुढील चार-पाच दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर तीव्र तापमानामुळे ही कोवळी रोपे वाचवणे कठीण होईल. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!