सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने रसिक श्रोते झाले मंत्रमुग्ध:सप्तखंजेरीच्या निनादात पिरंजी नगरी दुमदुमली; महापुरुषांच्या कार्याची आठवण

तालुक्यातील पिरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रबोधनात्मक कीर्तन सोहळ्यात प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक तथा प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाली होता. पावसाच्या लपंडावानंतरही हजारो नागरिकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच जननायक राघोजी भांगरे, राजर्षी शाहू महाराज आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत पार पडलेल्या या कीर्तन सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होेते. कीर्तनाच्या सुरुवातीला सत्यपाल महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग सादर करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करत मुलींना उच्च शिक्षण देण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे महत्त्व पटवून देताना महाराजांनी सुशिक्षित आणि चारित्र्यवान प्रतिनिधी निवडण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेतील सर्वधर्मसमभाव, संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व व्यसनमुक्ती अभियानाचा उल्लेख करत त्यांनी समाजप्रबोधन केले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे धार्मिक ऐक्याचा दिलेला संदेश ठरला. ढाणकी येथील शेख जब्बार यांना स्टेजवर बोलावून सत्यपाल महाराजांनी त्यांचा सत्कार केला. स्वतःची भगवी टोपी त्यांच्या डोक्यावर ठेवत त्यांच्या डोक्यावरील टोपी स्वतः परिधान करत आता काय फरक पडला? असा प्रश्न उपस्थित करून सर्व धर्मीय माणसे एकाच ईश्वराची लेकरं असल्याचा संदेश दिला. या प्रसंगाने उपस्थित श्रोते भावुक झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. दारू सोडा, लेकरं शिकवा, अंधश्रद्धा दूर करा, विज्ञानाचा स्वीकार करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिरंजी ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी श्रमदान आणि आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिरंजी येथील प्रबोधनात्मक कीर्तनात सत्यपाल महाराजांनी ‘वृक्षवल्ली’ अभंगातून पर्यावरण रक्षण आणि फुले दांपत्याच्या विचारांतून मुलींच्या उच्च शिक्षणाचे आवाहन केले. धार्मिक ऐक्याचा संदेश देताना त्यांनी मुस्लिम बांधवाशी टोपीची अदलाबदल करून सर्वधर्मसमभावाचे अनोखे दर्शन घडवले, ज्यामुळे उपस्थित श्रोते भावुक झाले. अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन करत हजारो नागरिकांनी यावेळी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. महापुरुषांच्या संयुक्त जयंती व स्मृतीदिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात पावसाच्या लपंडावातही पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी विक्रमी उपस्थिती दर्शवली.

Leave a Comment

error: Content is protected !!