संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. केंब्रिज चौकात अर्धा तास चक्काजाम! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने ऐन गर्दीच्या वेळी केंब्रिज चौकात ठिय्या मांडला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हा मुख्य महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आणि जालना रोडवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खासदार कल्याण काळे यांना ताब्यात घेतले, ज्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेतकऱ्यांच्या ‘या’ २ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. आंदोलनामागे प्रामुख्याने दोन मोठ्या मागण्या होत्या: 1. कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा: सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी त्वरित रद्द करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ द्यावा. 2. ऑनलाईन खतविक्रीचे ‘अ‍ॅप’ बंद करा: सरकारच्या ऑनलाईन खतविक्रीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. खतविक्रीसाठी सरकारने सुरू केलेले ऑनलाईन अ‍ॅप तात्काळ बंद करावे, अशी मागणी काळे यांनी लावून धरली. …तर पुन्हा दुसरे आंदोलन करू- कल्याण काळेंचा इशारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कल्याण काळे यांनी सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले, हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि ऑनलाईन खतविक्रीचे जाचक अ‍ॅप बंद केले नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे दुसरे मोठे आंदोलन छेडले जाईल.” परतूर येथे काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा महायुती सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आणि शेतकरी, कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जालना जिल्ह्यातील परतूर येथे तालुका काँग्रेस अध्यक्ष बालासाहेब आकात यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर्ससह हजारो शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सरसकट संपूर्ण कर्जमाफी, पीकविमा, अवकाळी नुकसानीची भरपाई, खतटंचाई, इंधन व गॅस दरवाढ, वीजप्रश्न, घरकुल योजनेतील भ्रष्टाचार आणि ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसने हा लढा उभारला आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास हा जनआक्रोश राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!