सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजना असल्याची माहिती प्रशासनाकडून समजली. त्याचा फटका १,१५० हेक्टरहून अधिक शेती क्षेत्राला बसणार आहे. धरणात सद्यस्थितीत ६ हजार ७६६ दशलक्ष घनफूट एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. हे प्रमाण मागील वर्षीच्या (२०२५) तुलनेत २ हजार ४०० दशलक्ष घनफूटाने कमी आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ‘एलनिनो’च्या संकटामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणे आणि जलाशयातून सुरू असलेली सिंचनासाठीची आवर्तने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नदी व कालव्यातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मुळा धरणाच्या बॅक वॉटर भागात शटडाउन घेतले जाणार आहे. सोमवारपासून (१५ जून) बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी म्हैसगाव, आग्रेवाडी, वरवंडी, बाभूळगाव, खडांबे, धामोरी परिसरात दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. २ हजार २६६ दलघफू पिण्यासाठी राखीव मुळा धरणाची क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. यंदा दोन रब्बीसह उन्हाळी आवर्तनानंतर सद्यस्थितीत ६ हजार ७६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यातून मृत जलसाठा सुमारे ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट वगळता, प्रत्यक्षात सुमारे २ हजार २६६ दलघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. बेकायदेशीर पाणी उपसा थांबवावाच लागेल पिण्यासाठी तसेच औद्योगिकसाठी ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी राखीव केले आहे. एलनिनोमुळे पाऊसच येणार नाही, असे नाही. पाऊस पडेल पण कमी पडेल. पिण्यासाठी पाणी राखीव केल्याने प्रशासनाला सतर्क व्हावे लागेल. विद्युत मोटरीद्वारे बेकायदेशीर पाणी उपसा थांबवावा लागेल. – उत्तमराव निर्मळ , निवृत्त कार्यकारी अभियंता. वीज तोडण्याबाबत महावितरणला दिले होते पत्र मुळा जलाशयातील उपसा सिंचन योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला पत्र दिले होते. त्यावेळी पिण्यापुरते चार तास वगळण्यात आले होते. परंतू, आता ३१ ऑगस्टपर्यंत पूर्णवेळ या योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणच्या समन्वयाने सोमवारपासून हा पुरवठा खंडित केला जाईल. – सायली पाटील, कार्यकारी अभियंता. सिंचनासाठी वापरले ८१८१ दलघफू पाणी मुळा धरणातून सोडलेल्या आवर्तनातून सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. यंदा ओव्हरफ्लोतून पहिले आवर्तन सोडले होते. त्यानंतर रब्बी हंगामात दोन आवर्तनासाठी उजव्या कालव्याद्वारे ८ हजार १८१ दशलक्ष घनफूट पाणी सोडले. तर डाव्या कालव्यातून दोन आवर्तनातून १०८७ दशलक्ष घनफूट पाणी सोडले.

Leave a Comment

error: Content is protected !!