Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ईव्हीएमची ‘अग्निपरीक्षा’:इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार ‘डायग्नोस्टिक टेस्ट’; नेमके काय होणार? वाचा

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या ‘बर्न मेमरी’मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे ‘डायग्नोस्टिक टेस्ट’? “हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. १६ आणि १७ एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल, ” असे मत या प्रकरणी याचिकाकर्ते नसीम खान यांनी व्यक्त केले. २०,६२५ मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी २०२४ मध्ये मात्र ही आघाडी तब्बल २०,६२५ मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण ५३% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी १,२४,६४१ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना १,०४,०१६ मतांवर समाधान मानावे लागले. २०१९ च्या ‘काट्याच्या’ लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ची चर्चा रंगली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!