उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य आहे. यावेळी त्यांनी असे काही म्हटले नाही. संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा, अमित शहा यांचा धाक म्हणजे काय आहे? हा काही व्यक्तिगत धाक नाही. त्यांच्या हातामध्ये ईडी, सीबीआय आहे म्हणून हा धाक आहे. उद्या सत्तेवर नसाल तेव्हा कसला तुमचा धाक? आमच्याकडे ईडी, सीबीआय असते तर आमचाही धाक राहिला असता. एका मंत्र्याला खासदार भेटला त्यात काही गैर नाही. उद्या जर माझ्या कामासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटायचे असेल तर मी सुद्धा त्यांना भेटेल. राष्ट्रहिताचे काम असेल तर मी नक्कीच पंतप्रधान मोदींना भेटेन. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांसोबत मी लोकांच्या कामासाठी चर्चा करत असतो. राजकारण वेगळे आणि लोकांची कामे करणे ही वेगळी गोष्ट आहे. आमचा बैठकीच्या वेळी अमित शहा यांच्याशी सुद्धा संवाद होत असतो.
मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी खुले संजय राऊत म्हणाले की, आज जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती गेल्या 12 वर्षांपासून देशात आहे. तृणमूल काँग्रेसचे 20-22 खासदार यांनी कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय पक्षात प्रवेश केला आहे. याला तुम्ही भाजपची हाव म्हणणार. पण शिवसेनेबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही. कोणत्या खासदारांनी पक्षाविरोधात कधीही वक्तव्य केलेले नाही. शरद पवार यांच्यानंतर लोकप्रतिनिधींना भेटणारा उद्धव ठाकरेंसारखा दुसरा नेता आज महाराष्ट्रात नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे सर्वांना भेटत असतात. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. ग्रामीण भागातील आमदार मुंबईत आले की ते उद्धव ठाकरेंना भेटतात. त्यामुळे उद्धव ठाकरे भेटत नाही ही बातमी चुकीची आहे. शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि राहतील. ..हे चित्र रंगवणे हे चुकीचे संजय राऊत म्हणाले की, एक खासदार मंत्र्यांना भेटला त्यावर खासदार फुटणार हे चित्र रंगवणे हे चुकीचे आहे. आमचे सर्व खासदार बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी आवाहन केले त्यानुसार ते ऑनलाईन उपस्थित राहिले यात काही चुकले का? मी गेली 24 वर्षे दिल्लीत आहे, मी भाजपच्या मंत्र्यांना भेटताना पाहिले का? जे घटनेचे पालन करत नाही, त्यांना मी भेटत नाही. आमच्या खासदारांनी आई भवानीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना शब्द दिला आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. मोदी, शहा, फडणवीसच विश्चासास पात्र का? संजय राऊत म्हणाले की, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हेच विश्वासपात्र उरले आहेत का? लोकं आमच्या बाजूने आहेत. काही काळाने लोकं सत्ताधाऱ्यांना जोड्याने मारतील. देशात संविधान आणि लोकशाही कुठे आहेत.
