एकजूट बैठकीनंतर 24 तासांत उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले:7 खासदार स्वतंत्र गट स्थापण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतले असून उद्धवसेनेचे लोकसभेतील ७ खासदार त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होताच उद्धव ठाकरेंनी १४ जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. त्यास ९ पैकी ४ खासदार प्रत्यक्ष आणि ५ खासदार एकजुटीने ऑनलाइन उपस्थित होते, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी रविवारी दिली. मात्र, त्यानंतर २४ तासांतच उद्धवसेनेवर फुटीचे ढग दाटले आहेत. कारण रविवारी ५ नव्हे, तर एकाच खासदाराने ऑनलाइन उपस्थिती लावली. चौघांनी बैठकीकडे पाठ फिरवली. गैरहजर राहण्याचे कारण कळवण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे निराश झालेल्या उद्धव ठाकरेंनी ‘ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे’ असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्याचदरम्यान कौटुंबिक कारण सांगून गैरहजर राहणारे यवतमाळचे खासदार संजय देशमुख दिल्लीत शिंदेसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले. त्यामुळे स्वतंत्र गट स्थापण्यासाठी ७ खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देणार असल्याचे म्हटले जात आहे. हे कळताच डॅमेज कंट्रोलसाठी खा. राऊत, खासदार अरविंद सावंत यांना सोमवारी दिल्लीला पाठवण्यात आले आहे. या विषयी खासदार राऊत म्हणाले की, या क्षणाला सर्व खासदार एकत्र आहेत. आम्ही ऑपरेशन लांडगा (वुल्फ) राबवणार आहोत. कोणी काही पत्र दिले तर त्यानंतर आम्ही त्यावर उत्तर देऊ. दुसरीकडे शिंदेसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी तर १६ आमदार, ७ खासदार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा दावा शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खोडून काढला. तर शिंदेसेनेच्या एका बड्या नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले, की ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिंदेसेनेत उद्धवसेनेच्या खासदार, आमदारांचा प्रवेश सोहळा कोणत्याही क्षणी होऊ शकतो. जाणाऱ्यांचे भले व्हावे ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. जाणाऱ्यांचे भले व्हावे. पण बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना आज ना उद्या पश्चात्ताप होणार आहे. -उद्धव ठाकरे आमचा अंधविश्वास : आदित्य
आमचे खासदार आमच्यासोबत आहेत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. खासदारांवर आमचा अंधविश्वास आहे. -आदित्य ठाकरे अंतिम बोलणी : आ. तुमाने
उद्धवसेनेचे १६ आमदार आणि ७ खासदार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असून अंतिम बोलणी झाली.प्रवेशाची तारीख ठरणे बाकी आहे. आ. कृपाल तुमाने (शिंदेसेना) संपर्क नाही : मंत्री सामंत
उद्धवसेनेच्या कोणत्याही खासदारासोबत आमचा संपर्क झालेला नाही आणि ऑपरेशन टायगरची कोणतीही बैठक झालेली नाही. -उदय सामंत (मंत्री, शिंदेसेना) डिलिमिटेशनसाठी तोडफोड आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने नाराजी वाढली सूत्रांनी सांगितले की, एप्रिलमध्ये संख्याबळाअभावी संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होऊ शकले नाही. पावसाळी अधिवेशनात तेच विधेयक पुन्हा आणण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यासाठी तृणमूलच्या १९, उद्धवसेनेच्या ७ खासदारांची फोडाफोडी सुरू आहे. डीएमकेच्या २२, वायएसआरच्या ४ खासदारांनी विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर राहावे, असा प्रयत्न आहे. रविवारी मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी पक्षनिष्ठा रस्त्यावर उतरून सिद्ध करा, असे म्हटले. त्यावर पक्षप्रमुख आणि त्यांचा गोतावळा रस्त्यावर उतरत नाही. मात्र, आम्हाला पक्षनिष्ठा सिद्ध करण्यास सांगितले जाते, असा नाराजीचा सूर खासदारांनी व्यक्त केला. देशमुखांच्या दिल्ली वारीवर खा. राऊतांची सारवासारव खासदार संजय देशमुख रविवारी बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. पण सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना भेटले, असे निदर्शनास आणून दिल्यावर खासदार राऊत सारवासारव करत म्हणाले की, नागपुरातून सकाळी ४.४५ ला दिल्लीला जाणारे विमान आहे. त्यामुळे ते डायरेक्ट नागपुरातून दिल्लीला गेले असतील. मतदारसंघातील अर्जंट काम होते, म्हणून बैठकीला आलो नाही, असे देशमुखांनी उद्धव ठाकरेंना सांगितले, असाही राऊत यांनी दावा केला.

Leave a Comment

error: Content is protected !!