अजित पवार विमान अपघात प्रकरण:’AAIB’च्या अहवालाशिवाय निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, न्यायालयाने काय म्हटले?

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज एक महत्त्वाचा निकाल दिला असून, जोपर्यंत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या दोन याचिका याचिकाकर्त्यांनी मागे घेतल्या आहेत. कारण जोपर्यंत या प्रकरणात ‘एएआयबी’चा (AAIB) अंतिम अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोणतेही निर्देश देता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. मात्र, संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचिकाकर्त्यांना याप्रकरणी न्यायालयात पुन्हा नव्याने दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोन महिन्यांत अहवाल सादर न केल्यास… जोपर्यंत ‘एएआयबी’ (AAIB) दिल्लीचा अंतिम अहवाल प्राप्त होत नाही आणि तपासाचे निष्कर्ष समोर येत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणी आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणावर पुढील विचार केला जाईल, अशी भूमिका न्यायालयाने घेतल्याने, आता आम्ही ‘एएआयबी’कडे पाठपुरावा करणार असून, त्यांनी दोन महिन्यांत अहवाल सादर न केल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात धाव घेऊ, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!