‘जरा जम के बरसो’ने दिला रसिक मनाला गारवा!:पाऊसगाण्यांतून बरसल्या सुरांच्या सरी, ‘साहस वैदर्भी आणि मैत्र जीवांचे’चा सांगीतिक नजराणा‎

श्रावणात घन निळा बरसला, वारा गाई गाणे… नभ उतरू आलं, मी डोलकर दर्याचा राजा, भिजून गेला वारा, मेघा रे मेघा रे, ये रात भीगी भीगी, रिमझिम गिरे सावन, ओ साजना बरखा बहार आयी सारखी बहुश्रुत गाणी… व तयार गळ्यांच्या गायकांनी त्या गाण्यांना दिलेला न्याय… सुरेल वाद्यवृंद. त्यावर कळस म्हणजे कानसेनांनी तुडुंब भरलेलं सभागृह… असा सुरेल संगम रविवारी संध्याकाळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात साधला गेला. निमित्त होते जरा जम के बरसो या सांगीतिक मैफिलीचे. पावसावर आधारित मराठी, हिंदी गाण्यांचा हा भावरम्य प्रवास अमरावतीकरांनी आपल्या रसिकतेची दमदार दाद देत केला. साहस वैदर्भी आणि मैत्र जीवांचेचा सांगीतिक नजराणा होता. आशुतोष देशपांडे, शीतल भट, केतकी मोहदरकर-देशपांडे आणि आदित्य खारोकर यांनी नवी-जुनी पाऊसगाणी हुकमी सादर करत रसिकांच्या मनावर गारुड केले. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चोरी चोरी चित्रपटातील ये रात भीगी भीगीपासून ते अगदी अलिकडच्या भिजून गेला वारापर्यंतच्या ७० वर्षांच्या गाण्यांचे उत्तम सादरीकरण करत सर्व गायकांनी आपल्या समर्थ गायकीचा परिचय दिला. टाळ्यांचा कडकडाट. पुन्हा पुन्हा वन्स मोअरचा प्रेमळ आग्रह. हा तब्बल अडीच तासांचा सांगीतिक सोहळा कानावाटे मनात साठवत अजून काही गाणी गायला हवी होती म्हणत रसिक घरी परतले. मदर इंडिया चित्रपटातील दुःख भरे दिन बिते रे भय्या या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. लोकप्रिय निवेदक नितीन भट यांचे सुश्राव्य निवेदन ही कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली. वाद्यवृंदात सिंथसायझरवर रामेश्वर काळे, तबल्यावर विशाल पांडे, ढोलकवर मनीष आत्राम, ऑक्टोपॅडवर वीरेंद्र गावंडे, बासरीवर जानराव देहाळे आणि गिटारवर अभिजित भावे यांनी भरगच्च संगत केली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्ताविकातून हेमंत थेटे यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी सूरमणी डॉ. कमलताई भोंडे, मुरलीधर भोंडे, सुनील सरोदे, अमित कोल्हटकर, चिन्मय जोशी, केदार जोशी, अंजली थेटे, प्रवीण चापोरकर, सुनील सरोदे, प्रवीण केवले, अविनाश शुक्ल, उदय पर्वतकर यांचे पाठबळ लाभले. प्रकाश आणि ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी गोपाल बंग यांनी सांभाळली. शब्दांच्या सरींमुळे आठवला पाऊस सध्या पावसाने उसंत घेतली आहे. जून महिना संपण्याकडे वाटचाल करीत असतानाही अद्याप आकाशातील सरी कोसळल्या नाहीत. परंतु शेतकरी पेरणी सुरू करू शकेल, एवढ्या पावसासाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. यंदाला आता हे शाश्वत वास्तव असले तरी कार्यक्रमात शब्दांच्या अशा काही सरी बरसल्या की जणू बाहेर ढगांनी छान वर्षाव चालवला आहे, असा भास प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून मात्र व्यक्त झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!