सुकलेल्या झाडांवर नगर परिषदेची मेहरबानी कशासाठी?‎:मृत झाडांना पाणी, हिरवळ मात्र गायब, घाटंजीतील अजब कारभारावर नागरिकांचा सवाल‎

शहर सुशोभीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या कामांची देखभाल कितपत होते, याचे वास्तव चित्र घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर पाहायला मिळत आहे. शिव मंदिर ते पोलिस स्टेशनपर्यंतच्या मार्गावरील दुभाजकात लावण्यात आलेल्या शोभेच्या झाडांपैकी तब्बल ८७ झाडे सुकलेली असतानाही त्यांना नियमित पाणी देण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या या अजब कारभारावर नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. शहराचा मुख्य रस्ता सुंदर दिसावा, हिरवाई वाढावी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी दुभाजकात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. शिव मंदिर ते पोलिस स्टेशन या मार्गावर जवळपास १५० झाडे लावण्यात आली होती. मात्र कालांतराने योग्य देखभाल आणि नियोजनाअभावी यातील अनेक झाडे सुकली. आजच्या घडीला जवळपास ८७ झाडे मृत अवस्थेत उभी आहेत. पाने गळालेली, फांद्या वाळलेल्या आणि जगण्याची शक्यता संपलेल्या या झाडांकडे पाहून सामान्य नागरिकही त्यांची अवस्था ओळखू शकतो. मात्र, नगर परिषद प्रशासनाकडून या झाडांना अद्यापही पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की, सुकलेल्या झाडांना पुन्हा जिवंत करण्याचा कोणता प्रयोग सुरू आहे का? झाडांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, आम्हाला पाणी देण्याचे सांगितले आहे, आम्ही ते काम करतो, अशी प्रतिक्रिया मिळते. कर्मचाऱ्यांची भूमिका आदेश पाळण्याची असली तरी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शहरातील नागरिकांचा सवाल आहे की, ज्या झाडांचे अस्तित्वच संपले आहे, त्यावर पाणी आणि देखभालीचा खर्च करण्यापेक्षा त्या ठिकाणी नवीन रोपे लावून त्यांचे संगोपन करणे अधिक योग्य नाही का? पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ औपचारिकता नको, तर प्रत्यक्ष हिरवाई दिसणे गरजेचे आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात उपरोधिक चर्चा रंगत आहे. झाडे सुकली तरी पाणी सुरू आहे. मात्र ही झाडे वाचणार की केवळ खर्चाचे चक्र सुरू राहणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. घाटंजी नगर परिषदेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शिव मंदिर ते पोलिस स्टेशन मार्गावरील सुकलेल्या झाडांची पाहणी करावी, मृत झाडे हटवून नवीन वृक्षारोपण करावे आणि शहराच्या सौंदर्यीकरणाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य करावा, अशी मागणी होत आहे. सुकलेल्या झाडांना नियमित पाणी मिळत आहे, मात्र ३७ महिने पूर्ण होऊनही नळ योजनेचे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही. झाडे सुकली म्हणून त्यांची काळजी घेतली जातेय, पण जिवंत माणसांच्या तहानेची काळजी कधी घेतली जाणार? झाडांना पाणी देणे सुरू आहे, मग नागरिकांच्या नळाला पाणी येण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार?

Leave a Comment

error: Content is protected !!