अंजनगाव-कोंडेश्वर मार्गाचे काम रखडले:ग्रामस्थ त्रस्त, 2018 मध्ये 25 कोटींचा निधी मंजूर, 2026 मध्ये 1 कोटींच्या कामाचे भूमिपूजन

अंजनगाव बारी अंजनगाव बारी ते तीर्थक्षेत्र कोंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीत या मार्गाच्या नूतनीकरण व डांबरीकरणाचा स्पष्ट उल्लेख असतानाही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. कामातील विलंब लक्षात घेऊन आ. रवी राणा यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधीतून मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी ५ फेब्रुवारी रोजी भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, भूमिपूजनानंतर सुरू झालेले काम काही अंतरावरच थांबले असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप वाढत आहे. या मार्गावर सुमारे ५०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, पूर्ण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काम पूर्ण होताच रस्त्यावर तडे गेल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विभागाने या कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तर उर्वरित मार्गावर खडी टाकून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. २१ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या शिखर परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र विकास निधीतून २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून उत्तम प्रकारे काम व्हावे डकरे “अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्ग हा परिसरातील नागरिक, शेतकरी व भाविकांसाठी जीवनवाहिनी आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असून प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.” -मिनल उ. डकरे, माजी पंचायत समिती सदस्या “अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्गाचे रखडलेले व निकृष्ट दर्जाचे काम नागरिक, शेतकरी आणि भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. -विरेंद्र पुनिया, नागरिक तथा शेतकरी, अंजनगाव बारी

Leave a Comment

error: Content is protected !!