विषारी दारूचे बळी हे प्रशासकीय खून:काँग्रेसचा 18 बळी गेल्याचा दावा; रोहित पवारांची हडपसर येथे दारू विक्रीच्या ठिकाणी तोडफोड

पुण्यातील विषारी दारूमुळे एक-दोन नव्हे तर तब्बल 15 जणांचा बळी गेला आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ परिसरात हे मृत्यू झालेत. महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेत 18 जणांचा बळी गेल्याचा दावा करत हे सर्व महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराचे खून असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट आशीर्वादाशिवाय अशी विषारी दारू विकणे शक्य नसल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हडपसर येथे बनावट दारूची विक्री होत असलेल्या ठिकाणी आपल्या समर्थकांसह तोडफोड केली. यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला आहे. पुण्यात विषारी दारूचे तब्बल 15 बळी:दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाई करण्याचे निर्देश पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मागील 48 तासांत 15 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून, कुणाचीही गय करू नका, असे ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराने केलेले हे प्रशासकीय खून असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून विषारी दारू विक्री करणाऱ्या दुकानाची तोडफोड केली. व्यवस्था काम करत नाही तेव्हा कायदा हातात घ्यावा लागतो यावेळी आपला रोष व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, जेव्हा सिस्टिम काम करत नाही, पोलिस प्रशासन कमी पडते, तेव्हा काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील, हा संदेश आम्हाला लोकांना द्यायचा आहे. राज्यात लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, पण सिस्टिम मदत करत नाही. अजित पवारांच्या बाबतीत सिस्टिम मदत करत नाही. दारू पिऊन गरिबांची माणसे मरतात, पण सिस्टिम काहीही करत नाही. त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांनी दारू अड्ड्याची तोडफोड केली. बुलडोझर धर्म बघून चालवला जातो. सामान्य लोकांचा जीव जातो. तेव्हा प्रशासन शांत बसते. रोहित पवारांनी ससून रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांचीही भेट घेतली. आत्ता पाहू काँग्रेसने काय म्हटले? काँग्रेसने म्हटले आहे की, पुण्यातील विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत संतापजनक घटना असून, हा महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराने केलेला थेट प्रशासकीय खून आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क (Excise) विभागाच्या भ्रष्ट आशीर्वादाशिवाय राजरोसपणे अशी विषारी दारू विकली जाणे अशक्य आहे. केवळ वसुली आणि ढिसाळ प्रशासनामुळे आज 18 घरे उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. या भीषण दुर्घटनेची थेट आणि नैतिक जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. गृहमंत्री केवळ राजकीय गणिते जुळवण्यात आणि स्वतःचे स्थान टिकवण्यात मग्न असल्यामुळे त्यांचे गृहखात्यावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. गुन्हेगारांवर “वरवंटा फिरवण्याच्या” पोकळ वल्गना करणाऱ्या गृहमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही धाक उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या निष्पाप जीवांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण जनतेचे प्राण वाचवू न शकणाऱ्या व्यक्तीला गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

भान असेल तर सरकारने जनतेची जाहीर माफी मागावी -रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, पुण्यात हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत भीषण आणि गृह विभागाच्या बेलगाम आणि भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेत मृत्यू झाल्याबाबतच्या कारणांचा काही अहवाल आहे का, याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेचं कारण सांगून हा अहवाल दाखवता येत नसल्याचं थातूरमातूर कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अनेकजण अजूनही मृत्यूशी झुंजत आहेत. राज्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवूनही सरकार त्याला आळा घालू शकलं नाही आणि यामुळंच अवैध दारू पिऊन 18 जणांचा बळी गेला, याची पूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पाशवी बहुमतामुळं हे सरकार केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेत आहे पण नैतिकदृष्ट्या या सरकारने कधीच जनतेचा विश्वास गमावलाय. त्यामुळं आपल्या जबाबदारीचं थोडं जरी भान या सरकारला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी. रोहित पवारांनी पोस्ट केला व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे बघा पुणे पोलिसांची कार्यक्षमता. (गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्हे तर वसुलीसाठी) ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तेच आज वसूली करत आहेत. त्यामुळेच आज सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्टयाबोळ झाला आहे. (spy कॅमेराची तारीख अपडेट केलेली नाही, म्हणून व्हिडिओमध्ये जुनी तारीख दिसत आहे), असे ते या प्रकरणी एक व्हिडिओ पोस्ट करताना म्हणालेत. सुनेत्रा पवारांचे घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले आहे. पुणे शहरातील हडपसर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने 12 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला कठोर कारवाई करून या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सखोल चौकशी करून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीअंती नियमानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्यात.

Leave a Comment

error: Content is protected !!