शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांच्या भाषेमुळेच ठाकरे गटाचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. ‘खासदारांनी दिलेल्या पत्रावर लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांबाबत विचारले असता प्रतापराव जाधव म्हणाले, “खासदारांनी जे काही पत्र दिले आहे, तो शिवसेना (UBT) चा अंतर्गत विषय आहे. त्यावर लोकसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील.” शिवसेना (UBT) च्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दिल्याच्या चर्चांदरम्यान जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास असलेले शिवसैनिक येतील’ उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत बोलताना जाधव म्हणाले, “उद्या शिवसेनेचा स्थापना दिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे सर्व शिवसैनिक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.” या विधानातून शिंदे गटाने पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावर आपला दावा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. संजय राऊतांवर थेट निशाणा यावेळी प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत ज्या प्रकारची भाषा वापरतात, त्यातूनच शिवसेना (UBT) चा विनाश होत आहे.” गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर आणि खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत संजय राऊत सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून महायुतीतील नेतेही वारंवार पलटवार करत आहेत. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना वेग शिवसेना (UBT) मधील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा, दिल्लीतील बैठका, लोकसभा अध्यक्षांकडे दिलेले अर्ज आणि नेत्यांच्या परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. एका बाजूला ठाकरे गटाकडून ही फूट रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असताना, दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील नेते याकडे ‘बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास असलेल्या लोकांचा निर्णय’ म्हणून पाहत असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे मेहनत घेतात आणि तुम्ही खासदार फोडतात, ही कसली लोकशाही?- संजय राऊत आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही यंत्रणेची धमकी कोणाला देत आहात? आम्ही कारागृहात जाऊन आलो आहोत, पु्न्हा जाण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला धडा शिकवून जेलमध्ये जाईल. आमचाच पक्ष मुळ शिवसेना आहे, शिंदेंचा गट आहे. जे दावा करतात आमचे खासदार फुटले त्यांनी ते सिद्ध केले पाहिजे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात ही कसली लोकशाही आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात जाऊन भाषणं करतात, त्यांनी देशात काय सुरू आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बैठकीला आम्ही खासदारांची वाट बघू नाहीतर कारवाईला सुरूवात करणार. जे खासदार फुटतील त्यांनी सुटी देणार नाही. बेईमानी करणाऱ्या लोकांना आता सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात आम्ही सभा घेणार आहोत यासाठी आमच्यासोबत शरद पवार आणि काँग्रेससुद्धा असणार आहेत. कोणी खासदार फुटला तर त्यांना आम्ही धडा शिकवू. सर्वांना व्हीप पोहोचला संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते अरविंद सावंत यांनी आज खासदारांची व्हीप काढत बैठक बोलावली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो त्यावेळी बैठकीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, तो एकप्रकारे पक्षाचा आदेशच असतो, तो पाळावाच लागतो. हा व्हीप सर्व खासदारांपर्यंत पोहोचला आहे. व्हीप त्यांना व्हॉटॲप, फोन, इमेल आणि त्यांच्या घरी सुद्धा पाठवण्यात आला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी उद्याच्या वर्धापन दिनाकडे लक्ष आता सर्वांचे लक्ष शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. या कार्यक्रमात कोणते नेते उपस्थित राहतात, खासदारांची पुढील भूमिका काय असते आणि लोकसभा अध्यक्षांकडून काय निर्णय घेतला जातो, यावर राज्याच्या राजकारणातील पुढील समीकरणे ठरणार आहेत.
