अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल:म्हणाले- लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत, पण खासदार फोडायला आहेत

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गट आणि अलीकडेच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. राज्यातील पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजपुरवठा, लाडकी बहीण योजना आणि शिवसेनेतील फुटीच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. एकच शिवसेना आहे, बाकी भाजपचे गुलाम शिवसेना (ठाकरे गट) सोडून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवसेना शिंदे गट असं काही नाही. एकच शिवसेना आहे आणि ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. बाकीचे भाजपचे गुलाम आहेत.” ते पुढे म्हणाले की, जे खासदार आज दुसऱ्या बाजूला जात आहेत, ते स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेले नाहीत. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर, भाजपविरोधी मतांवर आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित पाठिंब्यावर निवडून आले होते. “जनता ऑपरेशन टायगरचं ऑपरेशन करेल” सहा खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. त्यांनी म्हटलं की, “हे विकाऊ लोक आहेत. जनतेने सगळं पाहिलं आहे. लोकच आता त्यांना योग्य उत्तर देतील. कोणाचं ऑपरेशन करायचं हे जनता ठरवेल.” धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. “ओमराजेंकडून जास्त अपेक्षा होत्या. आम्ही त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम दिलं, साथ दिली. अशा वेळी सौदा करणं अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “लाडक्या बहिणींना पैसे नाहीत, पण खासदार फोडायला पैसे आहेत” राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होत नाही. अनेक विकासकामांची बिले प्रलंबित आहेत. एसटीसारख्या संस्थांकडे निधी नाही. “एका बाजूला सरकारकडे जनतेसाठी पैसे नाहीत, पण दुसऱ्या बाजूला खासदार आणि आमदार फोडण्यासाठी पैसा उपलब्ध आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे,” असा आरोप त्यांनी केला. “भाजपला सरकार चालवता येत नाही” राज्यातील पाणी आणि वीज संकटावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “भाजपला दंगे घडवता येतात, प्रचार करता येतो, वातावरण निर्माण करता येतं. पण शासन करता येत नाही. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणीकपात झाली आहे. नागरिकांना गढूळ पाणी मिळत आहे. विजेचे प्रश्न वाढत आहेत. पुण्यासह अनेक शहरांमध्ये आलटून-पालटून पाणीपुरवठा होत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी आरोप केला की, सरकारचे संपूर्ण लक्ष पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधी पळवणे आणि सत्ताविस्तारावर आहे. “समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प पूर्ण झाला असता तर…” मुंबईच्या पाणीप्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या काळातील डिसॅलिनेशन प्रकल्पाचा उल्लेख केला. “२०२१ मध्ये आम्ही समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प मंजूर केला होता. तो वेळेत पूर्ण झाला असता तर आज मुंबईकरांवर पाणीकपातीची वेळ आली नसती,” असा दावा त्यांनी केला. “विरोधी आमदारांना निधी मिळत नाही” सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. “आम्ही जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी आहोत. आम्हाला निधी दिला जात नाही म्हणजे फक्त आमच्या मतदारांवर नाही तर संपूर्ण जनतेवर अन्याय होतो. निधीच्या नावाखाली अनेकांना पक्षांतरासाठी दबाव टाकला जातो,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकरी, दुष्काळ आणि भ्रष्टाचारावरही टीका पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत त्यांनी कर्जमाफीच्या अटींवर नाराजी व्यक्त केली. राज्यातील रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला. “राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा औद्योगिक विकास महामंडळाचे रस्ते असोत, सर्वत्र भ्रष्टाचार दिसतो,” असा आरोप त्यांनी केला. “संविधान बदलण्यासाठी खासदार फोडले जात आहेत” आदित्य ठाकरे यांनी सर्वात गंभीर आरोप करताना म्हटलं की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला पूर्ण बहुमतापासून रोखलं. त्यामुळे आता विरोधी पक्षांचे खासदार फोडून पुन्हा संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. “आमचे खासदार का फोडले जात आहेत? कारण संविधान बदलण्याचे काहींचे स्वप्न अजून संपलेले नाही. जनतेने २०२४ मध्ये त्यांना रोखलं. आता निवडून आलेले खासदार फोडून पुन्हा तोच प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या आक्रमक टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेतील खासदारांच्या बंडानंतर ठाकरे गट आता अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले. विधान परिषद निवडणूक निकाल: महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. सविस्तर वाचा गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली: नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,” असे राऊत यांनी सांगितले. सविस्तर वाचा नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!