मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागात दमट हवामानासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीला ‘यलो अलर्ट’ दुसऱ्या बाजूला, मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागाला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत सकाळच्या सत्रात वांद्रे आणि वरळी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात काही अंशी वाहतूक संथ झाली होती. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा प्रवास रेंगाळला होता यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा प्रवास काहीसा रेंगाळला होता. साधारणपणे १० जूनच्या आसपास मुंबईत पोहोचणारा मान्सून यंदा तब्बल दोन आठवडे उशिराने सक्रिय झाला आहे. जूनच्या सुरुवातीला दक्षिण कोकणात प्रवेश केल्यानंतर मान्सूनची प्रगती थांबली होती, ज्यामुळे मुंबई-पुण्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, २१ जूनपासून राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून हवामान विभागाच्या मते २७ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल. पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या कामकाजात राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजटंचाई तसेच विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडी, सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आणि ‘ऑपरेशन टायगर’ यावरूनही सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारकडून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सविस्तर वाचा
