नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमित साटमांची BMCकडे मागणी

मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठविले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब हा शहरातील पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसावर १०० टक्के अवलंबून राहणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे साटम यांनी म्हटले आहे. शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करावा, तसेच त्या ठिकाणी आरओ प्रकल्प उभारून पाणी वापरयोग्य बनवावे, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. यानंतर परिसरातील भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा उभारता येईल. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्षारनिर्मूलन (डिसॅलिनेशन) प्रकल्पाची क्षमता १००० एमएलडीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यासाठीचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. हे ही वाचा… महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

Leave a Comment

error: Content is protected !!