किरण पावसकरांच्या विधानाने राजकारण तापले:बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप, शिंदे सेनेकडून सारवासारव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा हादरा दिला असतानाच, आता या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार सोमवारी अधिकृतपणे शिंदे गटात दाखल झाले. मात्र, या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे शिंदे सेनेचे नेते किरण पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका ऐतिहासिक आवाहनाचा संदर्भ दिल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पावसकर यांनी बाळासाहेबांच्या शब्दांची जाहीर खिल्ली उडवल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना किरण पावसकर हे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांमधील फरक समजावून सांगत होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांचे एक वाक्य वादाच्या भोवऱ्यात अडकले. पावसकर म्हणाले, “एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलतं, आता दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की, मुलाला सांभाळा… अरे हे काय पाळणाघर आहे का? आणि दुसरीकडे इकडे सांगितलं जातं की, शिंदे साहेबांनी (एकनाथ शिंदे) सांगितलं होतं, जे जे लोकं माझ्यासोबत आलेत, डॉ. श्रीकांत शिंदे त्यांची जबाबदारी ही तुमची आहे, तुम्ही माझ्यासोबत त्यांना सांभाळायचं आहे. हा दोन्ही पक्षांमधला फरक आहे.” अमित शहांचे सैनिक झालेल्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत – ठाकरे गटाचा पलटवार पावसकरांच्या विधानाचा व्हिडिओ समोर येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आणि प्रवक्ते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “ज्या बाळासाहेबांच्या नावावर आणि फोटोवर तुम्ही राजकारण करता, त्यांच्याच शब्दांची जाहीर सभेत खिल्ली उडवण्याची हिंमत तुमच्यात येतेच कशी? हा केवळ उद्धवजी किंवा आदित्यजींवरचा वार नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानाचा अपमान आहे,” असे ते म्हणाले. “सत्ता मिळाल्यामुळे इतका अहंकार आला आहे का की आता बाळासाहेबांचे शब्दही तुम्हाला विनोद वाटू लागले? मग रोज त्यांचे नाव घेण्याचा आणि विचारांचे वारसदार सांगण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का?” असा सवाल अखिल चित्रे यांनी केला आहे. “खरी शिवसेना कोणाची हे न्यायालय आणि जनता ठरवेल, पण अमित शहांचे सैनिक झालेल्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत, फक्त त्यांचे नाव हवे आहे. स्व. बाळासाहेबांचा हा अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही! ‘फेकनाथ मिंधे’ यांनी महाराष्ट्राची आणि शिवसैनिकांची माफी मागावी,” असे अखिल चित्रे म्हणाले. शिवसेना पावसकरांच्या विधानाची सहमत नाही – उदय सामंत हा वाद वाढल्यानंतर शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ सारवासारव करण्यास सुरवात केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसकर यांच्या विधानापासून पक्षाला दूर ठेवताना सांगितले की, “किरण पावसकरांचे वक्तव्य शिवसेना पक्षाचे नव्हते. ते त्यांचे भावनेच्या भरात केलेले वयक्तिक विधान होते. त्यामुळे त्यांचे ते वक्तव्य शिवसेनेशी कुणी जोडू नये. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आदर एकनाथ शिंदेंना असल्यामुळेच आज ते शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे पावसकरांच्या विधानाचा आणि शिवसेना पक्षाचा कुणीही संबंध जोडू नये.” पावसकरांच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा घेतला – म्हस्के नरेश म्हस्के म्हणाले, “किरण पावसकर यांच्या विधानाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतल्या जातोय. किरण पावसकरांच्या विधानाचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात होता. रेफरन्स कुठला, काय? हा विषय नाहीये. ते उद्धव ठाकरेंसंदर्भात बोलले.” पावसकरांच्या वक्तव्याला आमचे समर्थन नाही – शिरसाट संजय शिरसाट म्हणाले, “मुळात शिवसेना प्रमुखांनी जे काही आवाहन केले, त्यावर कुणी बोलणे हे चुकीचे आहे. आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या प्रत्येक वक्तव्याला आम्ही कधी त्याला क्रॉस केलेले नाही आणि करणारही नाही. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. किरण पावसकर यांनी कोणते वक्तव्य केले असेल, तर त्याला आमचे समर्थन नाही.” बाळासाहेबांचे २०१२ मधील ‘ते’ भावनिक आवाहन किरण पावसकर यांनी ‘पाळणाघर’ या शब्दाचा वापर करत थेट २०१२ च्या दसरा मेळाव्यातील बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणावर निशाणा साधल्याचा आरोप होत आहे. २०१२ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शिवसैनिकांना अत्यंत भावूक साद घातली होती. “मी आज साफ थकलो आहे, शारीरिकदृष्ट्या कोसळलो आहे. मी तुमच्यावर घराणेशाही लादलेली नाही, तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. मी उद्धव आणि आदित्यला तुमच्या हाती सोपवत आहे, यापुढेही त्यांना सांभाळा आणि इमानाला महत्त्व द्या,” असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेबांच्या याच अंतिम वचनांवर पावसकर यांनी टिप्पणी केल्याने निष्ठावान शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!