‘वखार महामंडळा’च्या कारभारावर संशयाचे धुके:हिंगोलीत 40 हजार क्विंटल हरभरा भिजून 20 दिवस उलटले, तरी नुकसानीचा अंदाज येईना

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातील किती हरभरा भिजला याचा वीस दिवसानंतरच वखार महामंडळाचा अंदाज आला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामात नाफेडने खरेदी केलेला सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला होता. मात्र ता. १३ जून रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गोदामाचे टीनपत्रे उडून गेली अन अँगल देखील तुटल्याने संपूर्ण हरभरा पोत्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वखार महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक कौस्तूभ दिवेगावकर यांनी तातडीने विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांना हिंगोली येथे पाठवून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनीही पाहणी केली मात्र त्यानंतर किती क्विंटल हरभरा भिजला याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही. यावेळी अधिकाऱ्यांनी हरभरा भिजला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही उलट शासनाचे नुकसान झाल्याचे सांगितले. त्यानंतर या गोदामातील हरभरा कलगाव येथील गोदामात हलविण्यात आला. त्याचा वाहतुकीचा भुर्दंडही शासनाच्या माथी मारण्यात आला आहे. सदर घटना होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला तरी नेमका किती क्विंटल हरभरा पिकांचे नुकसान झाले याचा अंदाज अद्यापही वखार महामंडळाला आलेला नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या कार्यपध्दतीवरच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यातच सदर गोदाम भाडेतत्वावर घेतांना कोणतेही निकष तपासण्यात आले नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता अद्यापही किती हरभरा भिजला हे सांगण्यास टाळाटाळ होत असल्याने या संशयाला पुष्टी मिळू लागली आहे. आता नुकताची अंतिम आकडेवारी कधी प्रसिध्द होणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. आणखी पाच ते सहा दिवस लागणार – सचिन जाधव, व्यवस्थापक वखार महामंडळ गोदामातील हरभरा भिजल्यानंतर पोते इतरत्र हलविण्यासाठी मोठा कालावधी गेला आहे. आता विमा कंपनीचे अधिकारी येऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज येणार असून त्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!