खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम शुगर्स या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सोमवार पासून कारखान्याच्या प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन सुरु केलेले आहे. दरम्यान, कारखाना प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारपासून १० जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. खर्डी (ता. पंढरपूर) येथील सिताराम शुगर्स या कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याने राखेच्या संदर्भात प्रदूषण मुक्तीची आणलेली मशीन बंद ठेवली असल्याने जवळपास ५ किलोमीटर परिसरात असणारी पिके तसेच घरांमधून राख पसरलेली दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक अबालवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडले असल्याचे दिसून येत आहे. दूषित पाणी, दूषित हवा, राख आणि बगॅसची धूळ यामुळे या परिसरातील पिके संकटात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांनी जनावरे सुद्धा यामुळे दगावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्याने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्याने अनेक विहिरींना व आजूबाजूच्या विंधन विहिरीला दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ लागले असल्याची तक्रार आजूबाजूचे ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत कारखाना प्रशासनाशी अनेक वेळा वारंवार पत्र व्यवहार करून देखील तसेच लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अनिल आगावणे, गजान न घाडगे, विष्णू सुळे, काशिलिंग सुळे, राजू पुंडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कारखान्याचे प्रदूषण चाचणी नियामक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. ^त्यांच्या मागण्या आहेत, त्यावर आम्ही त्यांना उत्तर दिलेले आहे. पोलीस डिपार्टमेंट येऊन गेले, त्यांनी कारखाना, प्रशासन आणि आंदोलकांना सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना प्रशासन घेत आहे. इथून पुढेही आम्ही सुधारणा करू, त्यांच्या ज्या पण मागण्या आहेत, त्या कारखाना पहिल्यापासून सोडवत आलेला आहे आणि इथून पुढेही सोडवू. – सुयोग गायकवाड, कार्यकारी संचालक, सीताराम शुगर्स त्रास होणार नाही याची दक्षता कारखाना घेणार
