पावसासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मारोबा देवस्थानाला साकडे:पेरणीनंतर पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे चिंता; सामूहिक प्रार्थनेतून चांगल्या पावसाची अपेक्षा‎

तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने अनेक ठिकाणी पिकांच्या उगवणीवर परिणाम होत असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी मारोबा देवस्थान येथे महाप्रसाद व सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. ऑटो चालक संघटना आणि व्यापारी युनियनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात परिसरातील शेतकरी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मारोबा देवाच्या चरणी चांगल्या पावसासाठी साकडे घालण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतीला संजीवनी देणारा भरघोस पाऊस पडावा, पिकांची वाढ सुरळीत व्हावी आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे कपाशी, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांच्या उगवणीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे. मारोबा देवस्थान हे परिसरातील श्रद्धेचे केंद्र मानले जाते. पावसाने दडी मारल्यास किंवा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास येथे महाप्रसाद, सामूहिक प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. या परंपरेतून ग्रामीण भागातील निसर्गाशी असलेले भावनिक नाते आणि सामूहिक श्रद्धेची भावना अधोरेखित होते. मारोबाची परंपरा आजही जिवंत पावसासाठी महाप्रसाद आणि सामूहिक प्रार्थना करण्याची परंपरा मारोबा देवस्थानात अनेक दशकांपासून सुरू आहे. पाऊस लांबल्यास शेतकरी, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना पुढाकार घेऊन येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता यांचे अनोखे दर्शन या उपक्रमातून घडते.

Leave a Comment

error: Content is protected !!