शेवटचं सांगतोय, कामाला लागा नाहीतर…:राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना 29 जूनचा अल्टिमेटम; ‘बॉम्ब’वरून संजय दिना पाटलांनाही सुनावले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी राज ठाकरेंनी थेट 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत काम न करणाऱ्यांना पदावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. तसेच, ‘मी बॉम्ब फोडीन, 5 खून केलेत’ अशी धमकी देणाऱ्या शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत हल्लाबोल केला. ढिम्म बसू नका, पायाला भिंगरी लावून फिरा! पक्षाच्या सुस्त कारभारावर राज ठाकरे प्रचंड संतापले होते. त्यांनी विभाग आणि शाखाध्यक्षांना फैलावर घेत म्हटले, “एकच गोष्ट वारंवार कितीवेळा सांगायची? निवडणुकांना सामोरे जात असताना जर आपल्याकडे आयुधंच नसतील, तर आपण काय करणार? विभागअध्यक्षांनो, ढिम्म बसू नका, घरात बसून राहू नका. पायाला भिंगरी लावून फिरा. उपविभाग अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांवर तुमचा वचक नाही, असे अजिबात चालणार नाही. वेळ खूप कमी आहे, अगदी घरातल्यांनाही कामाला लावा.” 29 जूनचा अल्टिमेटम आणि BLA नियुक्ती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘बूथ लेव्हल एजंट’ (BLA) ची अत्यंत कमी संख्या असल्याबद्दल राज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मुंबई शहरात 3000 आणि उपनगरात 8000 ‘बीएलए’ हवे आहेत. मात्र सध्या मनसेकडे फक्त 997 बीएलए आहेत. एसआयआर (SIR) संदर्भातील कामाला तातडीने वेग द्या. BLA रजिस्ट्रेशन पुन्हा करावे लागणार आहे.” “मी तुम्हाला 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देतोय. शेवटचं सांगतोय, कामाला लागा. आजपासून, या क्षणापासून कामाला लागा. जर माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर कुणाला पदावरून हटवलं, तर त्यानंतर माझ्याकडे शिफारस घेऊन अजिबात येऊ नका. आपण काम करायचं नाही आणि तोंडावर पडायचं, आता जर फसलात तर पुढे काहीच उपयोग नाही. मतदार याद्यांच्या कामात अलर्ट आणि सतर्क राहा. आपल्याच मतदारांची नावे कापली जात असतील तर पुढे आपण काय करणार आहोत?” खासदार संजय दिना पाटलांवर हल्लाबोल राज ठाकरेंनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘बॉम्ब टाकण्याच्या’ धमकीचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “एक खासदार खुलेआम बोलतो की ‘मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडीन.’ एखादा गँगस्टर जे बोलणार नाही, ते एक लोकप्रतिनिधी बोलतोय. एवढं बोलूनही त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही. कुठले खून केलेत? आणि कुठे बॉम्ब फोडलेत?” असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला. सत्तेतून पैसा आणि फोडाफोडी; भाजपचे लोकही हैराण देशातील आणि राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “आज देशात काय राजकारण सुरू आहे हे तुम्ही पाहताय. सत्तेतून पैसा आणि त्या पैशातून फोडाफोडी असे चक्र सुरू आहे. देशात सध्या भयंकर स्थिती सुरू असून भाजपचे लोकसुद्धा हैराण आहेत. जेव्हा हे सत्तेतून जातील, तेव्हा आपल्याला तर आनंद होईलच, पण सगळ्यात जास्त आनंद हा भाजपमध्येच होईल.” आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ‘ॲक्शन मोड’मध्ये येत पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आजच जैन समाजाच्या मालाड येथील एका शिष्टमंडळाने जिरेटोप आणि पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत माफीनामा दिल्याचेही समोर आले. संंबंधित बातमी वाचा जिरेटोपप्रकरणी जैन समाजाचा राज ठाकरेंकडे माफीनामा:कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंचा थेट इशारा मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या ट्रेंडवरून राज ठाकरे यांनी जैन समाजाला खडे बोल सुनावत अत्यंत कडक इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!