जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) गरीब रुग्णांचे देवस्थानच आहे. येथे पावसाची पाणी शिरून रुग्णांचे जे हाल झाले त्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) व महानगर पालिका आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गुरुवार २५ रोजी जिल्हाधिकाऱ्या दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील हजारो गरीब रुग्णांचा जीवनाधार असलेल्या इर्विन रुग्णालयाची स्थिती फारच दयनीय झाली आहे. येथे वारंवार रुग्णांच्या जीवाशी खेळ होतो. त्यामुळे केवळ मुसळधार पावसाचे कारण पुढे करून अक्ष्यम्य गुन्ह्यावर कोणालाही पांघरून घालता येणार नाही. ही संपुर्ण मानवनिर्मित आपत्ती असून यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचा निष्काळजीपणा तसेच मनपा आयुक्तांचा नियोजनशुन्य कारभार जबाबदार आहे. दरवर्षी इर्विनमध्ये पावसाचे पाणी शिरते याची जाण असतानाही सीएस यांनी बचावासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नाही. अति दक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग, सीटी स्कॅन विभागात पाणी शिरणे म्हणजे रुग्णांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. अगदी अक्ष्यम्य गुन्हा आहे. पाणी रुणालयात शिरल्यानंतरही ते बाहेर काढण्याची व्यवस्था न करणे तसेच विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतानाही त्यावर परिणामकारक उपाययोजना न करणे ही फारच गंभीर बाब असल्याचे निवेदनात प्रवीण हरमकर यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतिने उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांनी शिवसेना उबठाचे निवेदन स्वीकारले.
