शहरातील सामान्य रुग्णालय (इर्वीन) परिसरात २४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमागे नैसर्गिक नाला बेकायदेशीरपणे बुजवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रवीण हरमकर यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २७) तक्रार दिली आहे. हा नैसर्गीक नाला नेमका कोणी बुझवला, त्याचा शोध घेवून जबाबदार आढळणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विद्याभारती महाविद्यालयाच्या मागील भागातून रिझर्व लाईन, टोपे नगर, समाधान नगर, खापर्डे बगीचा मार्गे रेल्वे स्टेशन परिसराकडे जाणारा अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला नैसर्गिक नाला शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत होता. या नाल्याद्वारे परिसरातील पावसाचे पाणी तसेच अनेक घरांचे पाणी आउटलेटद्वारे वर्षभर वाहत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. हरमकर यांनी आरोप केला आहे की, सध्या सुरू असलेल्या मोठ्या बांधकामासाठी या नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात माती, राडारोडा व बांधकाम साहित्य टाकून तो पूर्णपणे बुजवण्यात आला आहे. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला असून रेल्वे स्टेशन परिसरात पुढे नाल्याचे अस्तित्वच दिसून येत नाही. या संदर्भातील छायाचित्रेही पुरावा म्हणून पोलिसांना सादर करण्यात आली आहेत. २४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसात पाण्याचा नैसर्गिक निचरा न झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात तसेच विविध वॉर्डमध्ये पाणी शिरले. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला, आरोग्य सेवा विस्कळीत झाली आणि शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हरमकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलणे किंवा तो बेकायदेशीररीत्या बुजवणे हे सार्वजनिक उपद्रव, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितास धोका निर्माण करणाऱ्या तरतुदींअंतर्गत दखलपात्र गुन्हा ठरू शकतो. तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील तरतुदींचेही उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नाला नेमका कोणी, कोणाच्या परवानगीने आणि कोणाच्या संगनमताने बुजवला, याची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डर, जमीनमालक तसेच या प्रकाराला सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा नोंदवावा, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिकेला नाला पूर्ववत मोकळा करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा, अनधिकृत बांधकामे आणि नैसर्गिक जलमार्गांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि तपास यंत्रणा या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वरीष्ठांकडून मार्गदर्शन मागवण्यात आले या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. या विषयी वरीष्ठांकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – पीआय रोषण शिरसाठ, ठाणेदार, शहर कोतवाली.
