एखाद्या आईच्या डोळ्यांतील अश्रू, बहिणीच्या मनातील प्रतीक्षा आणि कुटुंबाच्या हृदयातील वेदना शब्दांत मांडता येत नाहीत. मात्र, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या “नंददीप फाउंडेशन’च्या अथक प्रयत्नांमुळे आज एक सुवर्णक्षण साकार झाला. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे गेल्या एक वर्षापासून घरापासून दूर भटकत असलेला प्रकाश बाबुराव धनदर अखेर आपल्या हक्काच्या घरात, कुटुंबीयांच्या कुशीत सुखरूप पोहोचला आहे. नंददीप फाउंडेशनने दाखवलेल्या माणुसकीच्या हातांमुळे धनदर कुटुंबाच्या अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा “प्रकाश’ पडला आहे. या भावनिक भेटीने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. नंदिनी शिंदे आणि संदीप शिंदे यांनी उभारलेल्या नंददीप फाउंडेशन संचलित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा भावनिक पुनर्मिलाप शक्य झाला. प्रकाशला काही महिन्यांपूर्वी अत्यंत असहाय आणि भटक्या अवस्थेत घोडे या शिक्षकाला तो दिसला. त्यांनी प्रकाशला संस्थेच्या निवारा केंद्रात आणले होते. त्यावेळी त्याची मानसिक अवस्था गंभीर होती. त्याला स्वतःची ओळख होती, ना घराचा पत्ता माहिती होता. संस्थेने त्याला आश्रय, अन्न, वस्त्र आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर नियमित उपचार सुरू करण्यात आले. प्रेम, आपुलकी, संयम आणि सातत्यपूर्ण काळजीमुळे प्रकाश हळूहळू सावरू लागला. यानंतर नंददीप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्याची बहीण आणि कुटुंबीयांचा पत्ता शोधण्यात यश आले. तिरपुडे सोशल वर्क कॉलेज, नागपूरचे विद्यार्थी चेतन ठाकरे यांनी या पुनर्वसन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत दि. ११ जून रोजी प्रकाश याला अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव (फ.) येथे त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केले. भावाला पाहताच बहिणीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. कुटुंबीयांनी सांगितले की, “आमचा भाऊ एक वर्षापासून बेपत्ता होता. तो जिवंत असेल की नाही, याचीही आम्हाला खात्री उरली नव्हती. अनेक ठिकाणी शोध घेतला, पण काहीच माहिती मिळाली नाही. आज तो पुन्हा आमच्यासमोर उभा आहे, हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. नंददीप फाउंडेशन, चेतन ठाकरे यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. नंददीप फाउंडेशनचे कार्य केवळ बेघर मनोरुग्णांना निवारा देण्यापुरते मर्यादित नाही. त्यांना योग्य उपचार, सन्मानाचे जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा नाते जोडून देण्याचे महान कार्य ही संस्था करत आहे. प्रकाशच्या पुनर्वसनासह संस्थेने आणखी एक यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले आहे. हरवलेल्या माणसाला पुन्हा त्याचे घर, त्याची माणसे आणि जगण्याची नवी उमेद मिळवून देणे, यापेक्षा मोठी सेवा कोणती असू शकते? प्रकाशच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू हेच नंददीप फाउंडेशनच्या कार्याचे खरे यश आहे.
