पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ‘मृत्युदंडाची’ (फाशीची) शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून समाधान व्यक्त होत आहे. चार दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते आणि आज शिक्षेचा अंतिम निर्णय जाहीर केला. या निकालावर राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. “न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय घेतला असून पोलिसांनी देखील या प्रकरणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आरोपीला तिन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा झाली असून त्याला तात्काळ फासावर लटकवले जाईल. या कठोर निर्णयामुळे अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल आणि समाजात एक अतिशय कडक संदेश जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भर चौकात आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी- सुप्रिया सुळेंची मागणी नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा नराधमांना केवळ फाशीची शिक्षा न देता भर चौकात फाशी द्यावी, जेणेकरून समाजात अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीती निर्माण होईल, अशी मागणी त्यांनी केली. महिलांवरील आणि चिमुरड्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर शिक्षा आणि जलद न्याय ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा- सुनेत्रा पवार पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे.बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील. नसरापूर निकालाचे गिरीश महाजनांकडून स्वागत नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्वागत केले. “या निकालामुळे अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना निश्चितच आळा बसेल. या प्रकरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांचे अभिनंदन करतो. तसेच या खटल्यात काम करणारे वकील आणि न्यायाधीश यांचेही अभिनंदन. या प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, ही सर्वांचीच इच्छा होती,” अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली. विकृत मानसिकता असलेल्यांसाठी हा कठोर इशारा: चित्रा वाघ न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “विकृत मानसिकता असलेल्या समाजातल्या सगळ्याच नराधमांसाठी हा निकाल म्हणजे एक कठोर इशारा आहे. जर समाजात असा विकृतपणा कराल, तर कायदेशीर मार्गाने अशाच पद्धतीने तुमच्या नांग्या ठेचून काढू, असा एक अतिशय स्ट्राँग मेसेज या निमित्ताने न्यायालयाने दिला आहे.” भविष्यात कुणी अशी चूक करणार नाही: दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनीही या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. ते म्हणाले, “न्यायालयाने दिलेला हा निर्णय अत्यंत योग्य आणि कौतुकास्पद आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो. अशा नराधमाला फाशीचीच शिक्षा मिळायला हवी होती. या कठोर न्यायनिवाड्यासंदर्भातील बातमी ऐकून भविष्यात कोणतीही व्यक्ती असे क्रूर कृत्य किंवा चूक करण्याचे धाडस करणार नाही, असा हा धाक निर्माण करणारा निकाल आहे. संबंधित बातमी वाचा..
नसरापूर प्रकरण- नराधमाला फाशीची शिक्षा:16 दिवसांत आरोपपत्र, 55 हून अधिक साक्षीदार; गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे (वय 65) या नराधमाला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (सोमवारी, 29 जून) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत आणि खटल्याची सुनावणी केवळ 16 दिवसांत पूर्ण करून निकाल देण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच आणि सर्वात जलदगतीने निकाली लागलेला खटला ठरला आहे. सविस्तर वाचा
