बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ बालकाश्रमातील अतिश नीलेश तुपे. अनेक संकटांचा सामना करत त्याने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत यश मिळवत स्वतःचे आणि बालकाश्रमाचे नाव उज्ज्वल केले आहे.
मूळचा मुंबईचा असलेला अतिश इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता. मात्र, 2019 साली त्याच्या आईचे अपघाती निधन झाले आणि त्यानंतर कुटुंबावर आणि अतिशवरती मोठं संकट कोसळले. काही कौटुंबिक कारणांमुळे अतिश आणि त्याचा लहान भाऊ यांना बालकल्याण समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ बालकाश्रमात दाखल करण्यात आले. त्यावेळी अतिश अवघा 14 वर्षांचा होता, तर त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होता.
घरापासून दूर, नवीन वातावरणात राहणे आणि आयुष्यात अचानक झालेला हा मोठा बदल स्वीकारणे सुरुवातीला अतिशसाठी खूप अवघड होते. एक वर्षभर या ठिकाणी आल्यानंतर त्याला खूप त्रास झाला पण नंतर त्याने परिस्थितीशी जुळवून घेतले. बालकाश्रमातील संचालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला अगदी घरासारखं वातावरण दिले.
या सर्व परिस्थितीतून त्याला बाहेर काढायला मदत केली. संस्थेने त्याच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. अतिशने नियमित अभ्यास केला, व्यवस्थित क्लासेस केले आणि त्याने या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले आहेत. अतिशला मुलांना शिकवायची खूप आवड आहे. त्यामुळे तो आश्रमातील मुलांना गणित, इंग्रजी, विज्ञान असे विषय देखील शिकवतो.
अतिशचे स्वप्न मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे आहे. त्याचबरोबर आपल्या लहान भावाचे शिक्षण पूर्ण करून त्याचे भविष्यही उज्ज्वल घडवायचे, अशी त्याची इच्छा आहे. अतिश जेव्हा अठरा वर्षांचा पूर्ण झाला त्यानंतर त्याला संस्थेने दत्तक घेतले आणि त्याची संपूर्ण सोय ही आश्रमामध्ये केली. बालकाश्रमाच्या संचालिका डॉ. भाग्यश्री तांदळे-सानप, डॉ. गजानन सानप आणि अधीक्षक धोंडीराम काकडे यांनी त्याला संस्थेत राहण्याची विशेष परवानगी दिली आहे.