बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : राज्यात यंदाच्या मान्सून हंगामात अपेक्षित सर्वदूर पाऊस झालेला नसून अनेक भागांमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या प्रमुख कालावधीत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला असला, तरी राज्यात म्हणावा असा सर्वदूर आणि दमदार पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.
हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तसेच या कालावधीत मुसळधार पावसाचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी काही दिवस राज्यात सध्याचीच हवामान परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. वातावरणात काही महत्त्वाचे बदल झाल्यास त्याबाबत भारतीय हवामान विभागाकडून पुढील अंदाज स्पष्ट केला जाईल.
Weather Alert: महाराष्ट्रासमोर आता मोठं विघ्न, पावसाबद्दल चिंताजनक अपडेट
दरम्यान, सप्टेंबरच्या मध्यापासून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होण्याचा कालावधी असतो. राजस्थानमधून मान्सूनची माघार सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम पुढील काळातील हवामानावर होतो. महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार साधारणपणे ऑक्टोबरमध्ये होते. मात्र, यंदा परतीचा पाऊसही सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. सानप यांनी सांगितले.
१ जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे १६ टक्के पावसाची तूट आहे. विभागनिहाय परिस्थिती पाहिल्यास सर्वाधिक तूट मराठवाडा आणि विदर्भात आहे. मराठवाड्यात सुमारे ३७ टक्के, विदर्भात २४ टक्के, कोकण विभागात ११ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात सुमारे ५ टक्के पावसाची तूट आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ५० टक्क्यांपर्यंत असल्याचेही सांगण्यात आले आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ७० ते ८० टक्क्यांहून अधिक राहिली.
आगामी काळात बंगालच्या उपसागरात २२ ते २३ सप्टेंबरनंतर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रणालीची तीव्रता आणि तिची हालचाल कोणत्या दिशेने होते, यावर महाराष्ट्रातील पुढील पावसाचे वितरण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करता येणार नसल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
पावसाच्या तुटीचा परिणाम केवळ खरीप पिकांवरच नव्हे, तर भूजल पातळी, शेती आणि इतर क्षेत्रांवरही होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
याशिवाय आगामी दोन ते तीन महिन्यांत एल निनोची परिस्थिती अधिक तीव्र झाल्यास त्याचा परिणाम तापमानावर होऊ शकतो. दरवर्षीच्या तुलनेत तापमान काहीसे अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अर्थ लगेच उष्णतेची मोठी लाट येईल असे नाही. मान्सूनचे वारे कमकुवत होणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे आणि आकाश निरभ्र राहणे यामुळे तापमानात वाढ होऊ शकते. ऋतूतील बदलानुसार तापमानात चढ-उतार होत राहतील, असेही डॉ. सानप यांनी स्पष्ट केले.
एकंदरीतच, यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यातील पावसाची तूट चिंताजनक असून, परतीच्या मान्सूनकडूनही मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवता येणार नसल्याचे सध्याच्या हवामान परिस्थितीतून दिसून येत आहे.