बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर – द्राक्ष पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हवालदील न होता, पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडीच्या पदवीधर शेतकऱ्याने वेगळा प्रयोग केला. अवघ्या एका एकरामध्ये ‘कवाळे’ शेती करत अडीच ते तीन महिन्यांत तब्बल अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. गणेश तानाजी काळे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून त्याने ग्रामीण भागातील तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता गणेशने शेतीत नशीब आजमावण्याचे ठरवले. सुरुवातीला एका एकरात द्राक्षाची बाग लावली; मात्र, मोठा खर्च करूनही हवा तसा फायदा झाला नाही. अखेर धाडसी निर्णय घेत त्यांनी द्राक्षबाग मोडून काढली. जमिनीची उत्तम मशागत करून, शेणखत आणि मल्चिंग पेपरचा वापर करत त्यांनी कवाळ्याची लागवड केली. नागअळी व डंक माशी या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर योग्य फवारण्या घेतल्या.
वेळेची गुंतवणूक हेच भांडवल! सांगलीच्या धोत्रे कुटुंबानं डोकं लावलं, लाकडाच्या तुकड्यांपासून फायद्याचा बिझनेस, Video
लागवडीनंतर अडीच महिन्यांनी कवाळे तोडणीस सुरुवात झाली असून, पुढील दीड महिना ही तोडणी सुरू राहते. या भाजीवर्गीय पिकाचा वापर खाण्यासोबतच अमावास्या, पौर्णिमा आणि पूजेसाठी घराबाहेर बांधण्यासाठी केला जातो. गणेशने पिकवलेल्या कवाळ्याची विक्री नवी मुंबईतील वाशी आणि पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे. सध्या बाजारात 20 ते 30 रुपये प्रति किलोचा सरासरी दर मिळत आहे.
विशेष म्हणजे या पूर्ण शेतीसाठी गणेशला केवळ 10 हजार रुपयांचा प्राथमिक खर्च आला. आतापर्यंत 12 टन मालाची विक्री झाली असून सर्व खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांच्या पदरात पडले आहे. "तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न पळता, आधुनिक व नियोजनबद्ध शेती किंवा स्वतःचा व्यवसाय केल्यास नक्कीच यश मिळते," असा विश्वास गणेश काळे यांनी व्यक्त केला आहे.