बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Yuvraj Singh Manchanda murder case : एकीकडे गँगरेपच्या केसेसमुळे दिल्ली हादरली असताना दुसरीकडे आता दिल्लीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गुडगावला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या 31 वर्षीय एचआर व्यावसायिकाची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी युवराज सिंग मनचंदा यांच्या कथित हत्येप्रकरणी त्यांची माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना अटक केली आहे. या हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेत मन हेलावून टाकणारी स्टोरी समोर आलीये.
लग्नाची खरेदी करण्यासाठी गेला अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज लग्नाची खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. याच दरम्यान, त्याचे अन्या आणि संयम यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या मानेवर दोन गोळ्या झाडून त्याला ठार केले. त्यांनी त्याचा मृतदेह सात तास त्यांच्या क्रेटा कारमध्ये ठेवला. नंतर त्यांनी तो सेक्टर 70 मधील एका गटारात फेकून दिला आणि उत्तराखंडला पळून गेले. पोलिसांनी उत्तराखंडमधून त्या दोघांना अटक केली आहे.
पाच दिवस काहीच पत्ता नाही
पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज सिंग मनचंदा 6 सप्टेंबर रोजी दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये आपल्या बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. वराजने आपल्या बहिणीला सांगितले की त्याची गुरुग्राममध्ये एक मीटिंग आहे आणि तो रात्री 10 वाजेपर्यंत घरी परत येईल. युवराज रात्र होईपर्यंत घरी परतला नाही. त्याचा फोन बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पाच दिवस त्याचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
सीडीआर रिपोर्टमधून आरोपींचा शोध
युवराजच्या फोनच्या सीडीआर रिपोर्टमधून समोर आलं की, युवराजने त्याची पूर्वीची ऑफिस सहकारी, अन्या वत्स हिच्याशी संवाद साधला होता. त्यांनतर पोलिसांनी अन्याशी संपर्क केला, तेव्हा तिच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला अन् पोलिसांनी प्रकरण पालथं घातलं. त्यानंतर खरी घटना समोर आली आहे. चौकशीदरम्यान, अन्या आणि संयम यांनी युवराज सिंग मनचंदा यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली.