बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : नोकरीच्या मागे न धावता शेतीला व्यवसायाची जोड दिली तर मातीतूनही सोनं पिकवता येतं. हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी भारत कृष्ण गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधण्याऐवजी त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीत आधुनिक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
भारत गायकवाड यांनी अडीच महिन्यांपूर्वी आपल्या अवघ्या एक एकर शेतात सेंट या जातीच्या कोबीची लागवड केली होती. एक एकर क्षेत्रात साधारण 40 हजार कोबीच्या रोपांची लागवड करण्यात आली. लागवडीपासून ते पीक हाती येईपर्यंत त्यांनी पिकाची योग्य निगा राखली. कोबी पिकावर मुख्यत्वे पडणारा करपा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी वेळेवर औषध फवारणी आणि खतांचे नियोजन केले.
योग्य व्यवस्थापनामुळे अवघ्या 65 दिवसांत कोबी तोडणीस सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांच्या शेतातून 20 टन कोबीचे उत्पादन निघाले असून त्याची यशस्वी विक्री झाली आहे. बाजारात कोबीला सरासरी 10 ते 15 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. या संपूर्ण पिकासाठी लागवडीपासून तोडणीपर्यंत त्यांना सुमारे 80 हजार रुपये खर्च आला होता. सर्व खर्च वजा जाता भारत गायकवाड यांना अवघ्या तीन महिन्यांत 2 ते 2.50 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
आज अनेक उच्चशिक्षित तरुण 30 ते 40 हजार रुपयांच्या नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात. या पार्श्वभूमीवर भारत गायकवाड यांनी तरुणांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा आधुनिक पद्धतीने शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.