करंजी–वणी राज्य महामार्गावर झाला होता भीषण अपघात; एस.टी. बसचे दोन तुकडे
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील जळका फाटा परिसरात काल गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

करंजी–वणी मार्गावर MH-40 Y-5782 या एस.टी. बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या MH-28 BB-2827 या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बस अक्षरशः दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली होती.

या अपघातामध्ये जागीच मृत्यू: झालेल्या व्यक्तींचे नाव नवनाथ शिवाजी काचे (वय 30, रा. अंकुलगा, जि. लातूर) व भीमराव मरस्कोल्हे (वय 50, रा. मंगी, ता. केळापूर) आहे.

तर गंभीर जखमी: बसचालकासह शुभम ढोंबरे, रोहित योकनकर (मोहदा), सचिन झिलपे (बोटोनी), अमोल टेकसे (मेटीखेडा), संतोष खिलके (किंगा), प्रशांत चिंचोळकर (मेटीखेडा), विमल मरस्कोल्हे (मंगी), दुर्गा ठाकरे (ब्रम्हपुरी), नरेंद्र मडावी (मंगी), भीमराव मडावी (मंगी) आदी प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस व रुग्णवाहिका ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बसच्या चिरडलेल्या अवशेषांमधून प्रवाशांची सुटका केली.

सर्व जखमींना करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व गंभीर जखमींना पांढरकवडा व यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मारेगाव पोलिसांचा तपास सुरू आहे.
