समाजमन सुन्न, सतत राहायचा चिंतेत.
सुरेश पाचभाई मारेगाव,
पुणे येथे एका कंपनीमध्ये काम करणारा आणि गावामध्ये आईवडिलांच्या भेटीला आलेल्या एका शेतकरीपुत्राने विषारी औषधी घेऊन जीवन संपविले. समाजमन सुन्न करणारी ही घटना मारेगाव तालुक्यातील मुकटा येथे घडली.
असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव प्रफुल उत्तम तुराणकर, 29 असे आहे.प्रफुल हा अविवाहित आहे. घरची हलाखीची परिस्थिती आणि तीन भावांमध्ये फक्त 4 एकर शेती असल्याने इतर कामासाठी तो पुणे येथे गेला.तेथे बजाज कंपनीमध्ये काम करीत होता.घरच्यांच्या भेटीसाठी तो नुकताच गावाला मुकटा येथे आलेला होता.काही दिवसांपासून तो विमनस्क स्थितीमध्ये होता असे घरच्यांनी सांगितले.
घरची बेताची परिस्थिती आणि होत नसलेले उत्पन्न यामुळे वडील नेहमी चिंतेत दिसायचे.याचे त्याला दुःख व्हायचे.तो काल दि. 27 मे ला पुणे येथे जाणार होता.त्यामुळे त्याचे आई त्यांचेसाठी जेवणाचा डब्बा बनवून द्यायच्या कामी होती. वडील जनावरांना चारापाणी करायला शेतात गेलेले होते. ही संधी साधत प्रफुलने घरी असलेली विषारी औषधी घेतली.त्याला उलटी झाल्यामुळे ही गोष्ट आईच्या लक्षात आली.त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खासगी दवाखान्यात भरती केले.
ही घटना काल सायंकाळी 4.45 च्या दरम्यान घडली.चंद्रपूर येथे उपचारादरम्यान आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान प्रफुलची प्राणज्योत मालवली.पुणे येथे काम करणारा आणि तीन भावांमध्ये धाकटा असलेला प्रफुलच्या अचानक जाण्याने समाजमन सुन्न झाले आहे. प्रफुलच्या मागे आई वडील,दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.
