गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी (16 डिसेंबर) युतीच्या चर्चेची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही जागेबाबत चर्चा झाली नाही. केवळ प्रभागातील आरक्षण आणि बदललेले स्वरूप यावर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लिमबहुल वगळता 95 पैकी 65 जागांवर भाजपचा व शिंदेसेनेचा 55 जागांवर दावा आहे. मात्र, पहिल्याच बैठकीत वाद नको म्हणून दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांची संख्या उघड केली नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला, काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत संभाजीनगरच्या शहराध्यक्षांनी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा पर्याय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडला आहे. काँग्रेसची उद्धवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. शिवसेना, भाजप यांच्यात झालेल्या पहिल्या बैठकीला शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल, तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडमोडे, समीर राजूरकर, प्रशांत देसरडा हे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पहिल्या बैठकीत वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जागांचा प्रस्ताव दिला नाही. यावेळी केवळ कोणत्या प्रभागात काय स्थिती आहे, कसे बदल झाले आहेत, हिंदुबहुल प्रभागातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेसाठी 25 प्रभाग महत्त्वाचे आहेत. यातील 8 प्रभागांमध्ये भाजप आणि शिवेसना या दोन्ही पक्षांकडून दावा केला जाणार आहे. युती होत असली तरी भाजपसाठी जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार केला जाईल, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची उद्धवसेनेसोबत अद्याप चर्चाही नाही महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने मुंबईत शहराध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव तेथे मांडला आहे. उद्धवसेनापेक्षा ही आघाडी कशी फायदेशीर ठरणार आहे याचे गणितही मांडण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे ते स्वतंत्र निवडणूक लढवत असल्यास आमचीही तयारी आहे, असे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. शिवसेना-भाजप युतीचे अंतिम जागावाटप मंत्री निश्चित करणार युतीच्या बैठकांच्या आणखी 4 ते 5 फेऱ्या होणार आहेत. जागावाटपातील तोडगा 23 तारखेपर्यंत, अर्थात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्याचे युतीचे नियोजन आहे. 21 डिसेंबर रोजी नगर पालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यांचे पडसाद जागावाटपाच्या चर्चेवर होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यातील चर्चेअंती होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक स्थिती पाहता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळत नाहीत. पूर्व विधानसभा मतदारसंघात हा अनुभव काँग्रेसला आला. ‘मध्य’, ‘पश्चिम’ जागांवर शिवसेना लढल्यामुळे काँग्रेसला पक्षवाढीसाठी संधी मिळाली नाही. उद्धवसेनेसोबत आघाडी केल्यास हिंदुबहुल भागात काँग्रेसला स्थान मिळणार नाही. त्यामुळे वंचितसोबत आघाडीचा पर्याय ठेवला आहे.
