“लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपने विजयाची ‘सेंच्युरी’ मारली असून, शिवसेनेनेही 50 हून अधिक जागा जिंकत ‘हाफ सेंच्युरी’ पार केली आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट याही निवडणुकीत अव्वल राहिला असून, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या जागांची बेरीज केली, तरी ती एकट्या शिवसेनेच्या जागांपेक्षा कमी आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित न राहता आता चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजपला 119, शिवसेनेला 59 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 36 जागांवर विजय मिळाल्याचे चित्र आहे. या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करत विरोधकांवर निशाणा साधला. चांद्यापासून बांद्यापर्यंत भगवा फडकला निकालावर बोलताना शिंदे म्हणाले की, “काही लोक टीका करत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे. मात्र, आजच्या निकालाने दाखवून दिले आहे की, शिवसेना आता ठाण्यापुरती उरली नसून चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घराघरात पोहोचला आहे. हा विजय राज्यातील लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा आणि प्रत्येक मतदाराचा आहे.” भाजप नंबर एक, तर शिवसेना नंबर दोनचा पक्ष या यशाबद्दल त्यांनी मित्रपक्षांचेही कौतुक केले. “भारतीय जनता पार्टी राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करतो. तर शिवसेना आज नंबर दोनचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात समर्थपणे उभा राहिला आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळणारा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा पक्ष आहे,” असेही ते म्हणाले. विरोधकांना ‘घरचा’ रस्ता महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे यांनी घणाघाती टोला लगावला. ते म्हणाले, “ज्या नेत्यांनी निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि स्वतः घरी बसून राहिले, त्यांना मतदारांनी या निवडणुकीत कायमचे घरी बसवले आहे. महाविकास आघाडीच्या सर्व जागा एकत्र केल्या, तरी त्या शिवसेनेच्या तुलनेत कमी भरतात, यातच सर्व काही आले. आमचा हाच स्ट्राईक रेट आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही कायम राहील आणि तिथेही महायुतीचाच झेंडा फडकेल.” जनतेच्या न्यायालयाने न्याय दिला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या जागांची बेरीज केली, तरी शिवसेनेच्या जागांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. खरी शिवसेना कुणाची हे पुन्हा एकदा मतदारांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. शिवसेना ही शिवसैनिकांची, महाराष्ट्रातील जनतेची आहे. काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती. काही लोक स्वत:ला शिवसेनेचे मालक समजत होते. निवडणूक आयोगाला दोष देत होते. कोर्टावर आरोप करत होते. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असे म्हणत होते. आता जनतेच्या न्यायालयाने न्याय आणि कौल दिलेला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
