‘पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. पण आता ती वेळ आली आहे,’ असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी आता बोलण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते आपले बंधू नीलेश राणे यांच्यावर काही बोलतात की युतीतल्या नेत्यांवर याची उत्सुकता लागली आहे. नीतेश यांच्या या वक्तव्यावर नीलेश राणे यांनी मात्र कसलिही प्रतिक्रिया दिली नाही.
नीतेश नेमके काय म्हणाले हे माहिती नाही. ते जाणून घेईन आणि त्यानंतरच आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच निर्णय प्रक्रियेतून नारायण राणेंना बाजूला सारल्याने कोकणात पराभव झाल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. नेमके प्रकरण काय? कोकणात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांतील वादाने साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. ऐन निवडणूक प्रचारात नीलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याची घरी स्टिंग ऑपरेशन केले अन् पैशांची बॅग पकडली. यावेळी त्यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला.
भाजपने संस्कृती बिघडवल्याचाही दावा केला. त्यांच्याविरोधात नीतेश राणेही आक्रमक झाले. हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर लागलेल्या निकालात बहुचर्चित कणकवली आणि मालवणमध्ये शिवसेनेच्या नीलेश राणे यांनी वर्चस्व गाजवले. या विजयानंतर आता नीतेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. काय म्हणाले नीतेश राणे? कोकणात भावांभावांमध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीतल्या जिव्हारी पराभवानंतर भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी एक सूचक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात.
नीतेश आपल्या ‘एक्स’वरील ट्विटमध्ये म्हणतात की, ‘गप्प होतो..पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात..पण आता ती वेळ आली आहे.!’ असे गर्भित इशारेवजा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. नीलेश राणे यांचींही प्रतिक्रिया विजयानंतर नीलेश राणे आज मुंबईत पोहचलेत. एका वृत्तवाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
नारायण राणे साहेबांना काही लोकांनी बाजूला सारले. त्यामुळे हा संघर्ष येथे पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. ही पक्षाची नव्हे, तर काही लोकांची चूक होती. नारायण राणे यांनी मला माघार घ्यायला सांगितली असती, तर मी निवडणूक लढवलीच नसती, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. सोबतच नारायण राणेही या विजयाने खूप आनंदी झाले नसतील. मात्र, ही वेळ आमच्यावर आणल्याचे त्यांनी सांगितले. नीतेश राणे ट्विट आपण पाहिले नाही. ते जाणून घेतल्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे काय होणार? निवडणूक निकालानंतर नीलेश राणे यांनी नारायण राणे यांना या पूर्ण प्रक्रियेतून बाजूला सारल्याने आपण ही निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले.
नारायण राणे सोबत असते आणि शिवसेना भाजपमध्ये युती झाली असती, तर ही वेळच आली नसती, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आता नारायण राणे यांना कोणी बाजूला केले? नीलेश म्हणतात की पक्ष नव्हे, तर काही लोक? हे लोक नेमके कोण होते? असा प्रश्न आता समोर येतोय. नीतेश राणे हे नीलेश राणे यांच्यावर काही बोलणार की, या लोकांवर अथवा भाजपवर याची उत्सुकता लागली आहे.
त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी कोकणात पेटलेले धग काही केल्या कमी होताना दिसत नाही. इथून पुढे आणखी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
