Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:अजित पवार भ्रष्टांना तिकीट देतात, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एमआयएम, राष्ट्रवादी अन् बसपा आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक 28 मध्ये उमेदवारांमधील आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक प्रचाराला वेगळीच धार मिळाली असून भ्रष्टाचार, विकासकामांचा अभाव आणि मतदारांच्या विश्वासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एमआयएमचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बसपाच्या उमेदवारांनी एकमेकांवर केलेल्या थेट टीकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्यासपीठावर उमेदवारांच्या भूमिकांवर सवाल होत असून शहराच्या विकासासाठी नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न थेट जनतेकडून उपस्थित केला जात आहे. नेमका काय झाला राडा छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग नंबर 28 मधील एमआयएमचे उमेदवार अब्दुल मतीन खान यांनी अजित पवार हे सर्व भ्रष्ट्राचारी लोकांना तिकीट वाटप करतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात असा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत इंगोले म्हणाले की एमआयएमच्या उमेदवाराने काय केले हे सर्वांना माहिती आहे. आमच्या प्रभागातून यापूर्वी एमआयएमचे उमेदवारच निवडून आले होते. यापूर्वीचे जिल्ह्याचे खासदार जलील यांनी काय काम केली असा सवाल इंगोले यांनी केला आहे. आमच्या मतांवर खासदार झालेल्या माणसाने कधीही आमच्या वॉर्डमध्ये चक्कर मारली नाही, ना काही कामे केली. आमच्या परिसरातील कोणत्याच समाजातील व्यक्तीचे काम त्यांनी केले नाही. श्रीमंत उमेदवार आमचे प्रभागात येतात आणि आमचे मते घेऊन पळून जातात. काही जातीयवादी पक्षांनी ही चार मते देण्याची जो अधिकार दिला तो अतिशय चुकीचे आहे असे बसपाचे उमेदवार शंकर चौथे यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी शहराला लुटण्याचे काम केले माजी नगरसेवकाचे पती ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी शहराला लुटण्याचे काम केले आहे.भाजपचे सरकार असे आहे त्यांनी सर्व पक्षांमध्ये भांडणे लावली. नवरा-बायकोमध्ये भांडणे लावली. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फोडले. 1500 रुपये देऊन नवरा-बायकोमध्ये भांडणे लावले, असा आरोप केला. भाजप सर्वांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत आम्ही मविआ म्हणून शहराचा विकास करु. सत्ताधाऱ्यांना केवळ लोकांमध्ये भांडणं लावण्याचे काम करत पैसे वाटपाच्या माध्यमातून निवडून येण्याचे काम जमते. पाण्याची डेडलाईन उलटून जाऊन अनेक दिवस होऊन गेले फडणवीससाहेब क्या हुआ तेरा वादा, कधी येणार पाणी? असा सवाल त्यांनी केला आहे.

केलेल्या कामांवर मते मागणार दीपक निकाळजे म्हणाले की, यापूर्वी आम्ही एकनाथनगरमध्ये विकास केला आहे. माझी आई या वॉर्डातून नगरसेविका होती. यावेळी जे काम आम्ही केले त्या विकास कामांना घेऊन मी प्रभागात जाणार आहे. आमची लढाई ही धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असणार आहे. प्रभागात सर्वच नगरसेवक एकाच पॅनलचे निवडून आले तर विकास करणे सोपे होऊ शकते नाही तर विकास होणं अवघड आहे. राज्यात महायुती आणि मविआ दोघांचीही सत्ता गेली अनेक वर्षे आहे मग त्यांनी संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न अजून का सोडवला नाही? ठेकेदारांचा फायदा करुण देत टक्केवारी वसुल केली जाते, त्यामुळेच शहर मागे राहिले आहे, असा आरोप निकाळजे यांनी केला आहे.

पाण्याची एक ठराविक वेळ नाही ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲड. दीपक क्षीरसागर म्हणाले की, आमच्या वॉर्डात बरीच कामे झाली आहेत हे नाकारता येणार नाही. पण मागील काळात प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य केले गेले नाही.पाणी येण्याची एक वेळ नाही त्यामुळे आम्हाला त्रास होतो. अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे महिलांना त्रास होत आहे. यावर लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसताना त्यांनी पाण्यासाठी मोर्चा काढला पण त्यानंतर ते लोकांचे पक्ष आणि घर फोडण्यात व्यस्त झाले त्यांना पाण्यासाठी वेळ मिळाला नाही.

अजित पवार भ्रष्ट्राचारी लोकांना तिकीट देतात एमआयएमचे उमेदवार अब्दुल मतीन खान म्हणाले की, अजित पवार हे सर्व भ्रष्ट्राचारी लोकांना तिकीट वाटप करतात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांतर ही लोकं सांगतात की आम्ही गरीबांची कामे करणार म्हणतात. या लोकांनी गरीबांचे वाटोळे केले आहे. त्यांनी समाजकल्याण विभागातील गरीबांचा फंड दुसरीकडे वळवला आहे. आमच्या बनेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहे. माजी खासदार जलील यांच्या विकास कामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ही लोकं पैसे वाटून निवडून येतात आणि लोकांमध्ये राहत नाहीत, असा आरोप त्यांनी सर्व माजी नगरसेवकांवर केला आहे.

शिरसाटांनी कामे केली शिवसेनेचे नितीन साळवे म्हणाले की, आमच्या प्रभागात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सर्व कामे केली आहेत. प्रभागातील कुणीही त्यांच्याकडे गेले तर त्यांचे काम नक्कीच होते. प्रभागात सार्वजनिक शौचालय नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भारत इंगोले म्हणाले की, आमच्या प्रभागात एकही सार्वजनिक शौचालय नाही ते उभारले गेले पाहिजे. तर आमच्या परिसरात अभ्यासिका बंद पडली आहे. तर दुसरीकडे आमच्या प्रभागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात लाडक्या बहीणी आहेत अजित पवारांनी त्यांच्यासाठी पैसे दिले आहेत. त्या नक्कीच आम्हाला साथ देतील. रोड बनवताना बोगस कामे केली राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश मोरे म्हणाले की, आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची आहे. स्मार्टसिटीमध्ये रोड बनवत असताना बोगस कामे केली आहेत. रोड तयार करत असताना ठेकेदारांच्या फायद्याची कामे केली आहेत, त्यावेळी पाणी आणि ड्रेनेजच्या लाईनसाठी काहीही नियोजन केलेले नाही. आमचा प्रभागामध्ये बराच प्रमाणात गरीब कुटुंब राहतात, त्यांना 7 ते 8 दिवस पाणी साठवता येत नाही त्यांच्याकडे त्यामुळे पाणी लवकर आले पाहिजे. शहराचा विचार केला तर आमच्या संभाजीनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष देणं गरजेचे आहे. रस्त्यावर आडून तलवार-चाकू दाखवून नागरिकांना लुटले जाते, ही गुन्हेगारी का वाढते आहे यावर काम करणं गरजेचे आहे.

या आहेत समस्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रभागाचा विचार केला तर या प्रभागात तिन्ही लोकवस्ती आहे. यामध्ये काही ठिकाणी पाण्याचा, कचरा, रस्ते नसणे, अस्वच्छता, यासह आरोग्य समस्या आणि ड्रेनेज लाईन व पूर्ण वेळ वीज नाही या मुख्य समस्या आहेत. तर बनेवाडीकडून राहुलनगर ला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्वचछता आहे. ज्यामुळे तिथल्या लोकांना आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर या प्रभागातील स्मशानभुमीमध्ये ड्रेनेजचे पाणी साचलेले असते असे नागरिकांनी सांगितले. तर दुसरीकडे स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या शहरातील महिला अजूनही डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणतात अशी समस्याही नागरिकांनी सांगितली.

असा आहे प्रभाग एकनाथ नगर, म्हाडा कॉलनी, फुलेनगर, मिलिंद नगर, बनेवाडी, द्वारकापुरी, कबीर नगर, नागसेन नगर,गावठाण, राहुल नगर, सादत नगर, थर्टी ग्रीन कॉलनी, हमालवाडा, रेल्वे स्टेशन, सिल्कमिल कॉलनी, महुनगर, विवेकानंदपुरम, महावीर नगर, संजय को.ऑ.हौ.सो. जय नगर, शाहशोक्ता कॉलनी, अमृतसाई रेसीडेन्सी,अबरार कॉलनी हा 46 हजार लोकवस्तीचा भाग या प्रभागात येतो.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!