प्रतिनिधी | मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तीर्थक्षेत्र ग्राम नागपूर येथे रविवारी दुपारच्या अचानक दोन मोटरसायकली जळून खाक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली. आग गावात पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. खोडसाळपणे आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. लाखपुरी येथील प्रकाशसिंग चव्हाण यांच्या मालकीच्या दोन मोटरसायकली घराच्या कंपाऊंडमध्ये असताना दुपारी मोठा आवाज आला. आवाज ऐकून प्रकाशसिंग चव्हाण बाहेर आले. त्यांना आग लागलेली दिसली. आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ धावून आले. ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या व शेडसुद्धा जळाले आहे. लागूनच असलेल्या खोलीत २४ पोते तुरीचे होते. सुदैवाने सदर तूर आगीच्या तडाख्यातून वाचली.