बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, इंधन दरवाढ तातडीने कमी करावी, या मागणीसाठी दिंडोरी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली असून शेती व्यवसायही अडचणीत सापडत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने इंधनावरील करांचा फेरविचार करून दर कमी करावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पिंगळ यांनी इंधन दरवाढीसाठी सरकारची धोरणे कारणीभूत असल्याचा आरोप करत, दरवाढ रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच तालुका कार्याध्यक्ष प्रा. नारायण पाटील यांनी निवेदनाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे आवाहन केले. यावेळी पंडितराव गायकवाड, सुनील आव्हाड, वाळू जगताप, दिलीप शिंदे, नामदेव राऊत, धर्मराज जोपळे यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.