अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपने अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ‘विचित्र’ समीकरणांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही युती चालणार नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावीच लागेल. ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, अकोट आणि अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अकोटमध्ये ‘एमआयएम’ आणि अंबरनाथमध्ये ‘काँग्रेस’सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी नेटवर्क’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत.” अकोटमध्ये ‘अजब’ विकास मंच! अकोट नगरपरिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला आहे. या आघाडीचे स्वरूप पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. या मंचमध्ये भारतीय जनता पक्ष, एमआयएम (MIM), शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती (बच्चू कडू) पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे या नव्या गटाची अधिकृत नोंदणीही केली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेतही काँग्रेससोबत हातमिळवणी अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले आहे. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या युतीत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमत स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांच्या हाती कोलीत भाजपच्या या स्थानिक प्रयोगांमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. “भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध झाले आहे,” अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
