राज्यातील सत्तासमीकरणांचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे पडसाद आता थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर प्रभाव टाकू लागल्याचे चित्र आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही सत्ता स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही. अशा परिस्थितीत पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले. मात्र, त्यांच्या या एका वाक्यानेच कोल्हापुराच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात संभाव्य युती होण्याची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोल्हापूर महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता, काँग्रेसकडे 34 जागा असून ती सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपकडे 26 जागा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 1 जागा आणि इतरांकडे 1 जागा आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची मॅजिक फिगर आवश्यक आहे. सध्या कोणताही पक्ष एकट्याच्या जोरावर हा आकडा गाठू शकलेला नाही, त्यामुळे युतीशिवाय पर्याय उरलेला नाही. राजकीय गणित पाहता, काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आल्यास त्यांच्याकडे 49 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत तयार होऊ शकते. त्यामुळे मुंबईत शिंदेंना डावलले गेले, तर कोल्हापुरात काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिंदे गटासाठी खुला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईतील सत्तासंघर्षाचा परिणाम राज्यातील इतर महापालिकांवरही होणार असल्याचे संकेत यामुळे अधिक ठळक झाले आहेत. या निवडणुकीत कोल्हापुरात थेट लढत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि महायुती यांच्यातच रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गजांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. मात्र, तरीही काँग्रेसने 34 जागा जिंकून आपली ताकद कायम ठेवली. सतेज पाटील यांनी तिसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता कोल्हापुरात आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र महायुतीने मॅजिक फिगर गाठत काँग्रेसचे हे स्वप्न रोखले. तरीही, चित्र पूर्णपणे संपलेले नाही. महायुतीकडे काठावरचे बहुमत असले, तरी स्थिर सरकारसाठी आवश्यक असलेला आकडा आणि विश्वासार्हता अद्याप प्रश्नात आहे. अशातच काँग्रेस-शिंदे गट युतीचा पर्याय समोर येत असल्याने कोल्हापुरातील सत्ता गणित पुन्हा एकदा उलथापालथीच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. सतेज पाटील यांच्या सूचक विधानामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबईतील सत्ता समीकरणांवरच कोल्हापूरसह राज्यातील अनेक महापालिकांचे निर्णय अवलंबून असू शकतात. जर मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये मतभेद वाढले, तर त्याचे पडसाद कोल्हापुरात स्पष्टपणे उमटू शकतात. त्यामुळे सतेज पाटील शिंदेंच्या साथीने कोल्हापुरात सत्ता गेम फिरवणार का? हा प्रश्न सध्या संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील काही दिवसांत पडद्यामागील हालचाली उघडकीस येण्याची शक्यता असून, कोल्हापुराच्या सत्तास्थापनेचा अंतिम फैसला लवकरच होणार आहे.
