मुंबईत बिहारच्या नितीश सरकारचा मास्टरस्ट्रोक:30 मजली ‘बिहार भवन’ उभारून आर्थिक राजधानीत ताकद वाढवणार; 314.20 कोटी रुपयांचा खर्च

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता बिहार सरकारची ठळक आणि भक्कम उपस्थिती दिसणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, हा प्रकल्प केवळ एक इमारत नसून बिहारच्या प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचा नवा अध्याय ठरणार आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या लाखो बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचे आधारकेंद्र ठरणार असल्याचं मानलं जात आहे. प्रस्तावित बिहार भवन हे 30 मजली असणार असून, बेसमेंटसह इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असेल. ही इमारत अत्याधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, आधुनिक शहरी नियोजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आधुनिकतेसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. या भव्य इमारतीत सौर पॅनेल बसवण्यात येणार असून, ऊर्जेच्या गरजांसाठी नवीकरणीय स्रोतांचा वापर करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय, इमारतीभोवती हिरवळीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार असून, हा प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार उभारला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणीय जबाबदारी जपत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा बिहार सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवरच मुंबईतील हे भवन देखील सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या इमारतीत बिहार सरकारच्या विविध विभागांची कार्यालये, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र विभाग, तसेच बैठका आणि कार्यक्रमांसाठी 72 आसनांची अत्याधुनिक सभागृहे असतील. याशिवाय, अधिकाऱ्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी आधुनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या बिहार सरकारच्या अधिकाऱ्यांना तसेच राज्याशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी सोय होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारितील एलफिंस्टन एस्टेट परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2952.77 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलं आहे. इतक्या मोक्याच्या ठिकाणी बिहार भवन उभारल्यामुळे मुंबईतील प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांशी बिहार सरकारचा थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च बिहार सरकारकडून करण्यात येणार आहे. एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र मुंबई ही रोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि उपचार यासाठी देशभरातील लोकांचं प्रमुख केंद्र आहे. बिहारमधील हजारो विद्यार्थी, कामगार, उद्योजक आणि रुग्ण दरवर्षी मुंबईत येत असतात. अशा परिस्थितीत, बिहार भवनामुळे या नागरिकांना निवासाची सोय, शासकीय मार्गदर्शन, तसेच विविध प्रकारच्या सहकार्याची सुविधा एका छताखाली मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र ठरणार आहे. मुंबईत बिहार सरकारची उपस्थिती अधिक बळकट दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, एलफिंस्टन एस्टेट परिसरातील सीमा भिंतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईत बिहार सरकारची प्रशासकीय उपस्थिती अधिक बळकट होणार असून, बिहार राज्याच्या विकासात्मक धोरणांना राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!